शेतकऱ्यांच्या तक्रारींचे त्वरित निराकरण करावे
- पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपुर : जुलै व ऑगस्ट 2022 या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतपिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले होते. सदर शेतपिकांच्या झालेल्या नुकसानापोटी शासनाने हेक्टरी 13 हजार 600 रू. , महत्तम ३ हेक्टरपर्यंत नुकसान भरपाई मंजूर केली आहे. या संदर्भात पोंभुर्णा व गोंडपिपरी तालुक्यातील लोकप्रतिनिधी व शेतकऱ्यांकडून तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. या तक्रारींचे तातडीने निराकरण करण्याचे निर्देश पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
गावातील शेतीचे नुकसानीचे पंचनामे प्रत्यक्ष शेतावर न जाता करण्यात आलेले आहेत. प्रत्यक्षात नुकसान झालेल्या शेताचे क्षेत्र कमी नोंदविण्यात आले असून काही नदीकाठील गावांचे सर्व्हेक्षण व पंचनामे करण्यात आले नाही. नुकसान भरपाई मंजूर झालेल्या शेतकऱ्यांची यादी ग्रामपंचायत स्तरावर लावण्यात आलेली नसल्याने गावातील कोणत्या शेतकऱ्याला किती नुकसान भरपाई मिळाली किंवा कसे हे लक्षात येत नाही. सर्व्हेक्षण करणारे कृषी सहायक, तलाठी व ग्रामसेवक यांनी हलगर्जीपणाने सदर सर्व्हेक्षण केले आहे, अशा तक्रारी शेतकऱ्यांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केल्या आहेत. या तक्रारींचे तातडीने निराकरण करून शेतकऱ्यांना योग्य न्याय देण्याचे निर्देश त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
News - Chandrapur