तलाठी भरतीतील चंद्रपूर जिल्ह्यातील पदे पूर्ववत ठेवा : यंग चांदा ब्रिगेडची मागणी
- जिल्हाधिकारी यांना निवेदन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : तलाठी परिक्षेतील पदे कमी न करता जाहिरातीत दर्शविण्यात आल्या प्रमाणेच पदांची संख्या पुर्वरत ठेवण्यात यावी अशी मागणी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली असून सदर मागणीचे निवेदन त्यांच्या वतीने जिल्हाधिकारी विनय गौडा यांना देण्यात आले आहे.
यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे शिक्षण विभाग प्रमुख प्रतीक शिवणकर, युवा नेता अमोल शेंडे, अल्पसंख्याक विभागाचे शहर अध्यक्ष राशिद हुसेन, अल्पसंख्याक विभागाचे युथ शहर अध्यक्ष राशेद हुसेन, प्रसिद्धी प्रमुख नकुल वासमवार, शहर संघटक करणसिंह बैस यांच्यासह विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
शासन जाहिरात नुसार राज्यात तलाठी पदभरती प्रसिध्द करण्यात आली होती. सदर जाहिरात मध्ये चंद्रपूर जिल्ह्यासाठी एकुण १६७ पदे देण्यात आली होती. यात अनुसुचित जाती प्रवर्गासाठी १९ पद आणि ओबीसी साठी ४६ जागा भरण्यात येणार होत्या
मात्र ७ नोव्हेंबर २०२३ ला शासनातर्फे सुधारित मागणीपत्रक प्रसिध्द करण्यात आले असून त्यामध्ये चंद्रपूर व इतर ७ जिल्हयातील पदे कमी करण्यात आली आहे. यात चंद्रपूर मध्ये अनुसुचित जाती च्या १९ जागेवरुन फक्त १३ जागा आणि ओबीसी च्या ४६ वरुन सरळ २७ जागा देण्यात आल्या आहे. यात विशेष म्हणजे चंद्रपूर जिल्हयात पूर्वी देण्यात आलेल्या जागेवरुन ५६ हजार अर्ज प्राप्त झाले होते. पण आता निकालाच्या आधी शासनाने पदे कमी करुन स्पर्धा परीक्षाची तयारी करणाऱ्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांवर मोठा अन्याय केला आहे. त्यामुळे अनेक युवकांचे स्वप्न भंगले आहे. हि बाब लक्षात घेता तलाठी भरतीतील चंद्रपूर जिल्ह्यातील पदे पूर्ववत ठेवण्यात यावी, अशी मागणी सदर निवेदनाच्या माध्यमातून यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे.
News - Chandrapur