पुण्यात गारवा बिर्याणी मॅनेजरच्या डोक्यात वार करुन खून, धायरी येथील घटना


विदर्भ न्युज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / पुणे : काम संपल्यानंतर दुचाकीवर घरी जात असलेल्या गारवा बिर्याणीच्या मॅनेजरवर अज्ञातांनी डोक्यात वार करुन त्यांचा खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. चोरीच्या उद्देशाने हा हल्ला झाला नसून हल्लेखोरांचा नेमका उद्देश अद्याप स्पष्ट झाला नाही.
भरत भगवान कदम (२४) रा. धायरेश्वर प्राईड, मतेनगर, धायरी असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचा भाऊ प्रकाश भगवान कदम यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत पोलीस निरीक्षक जयंत राजुरकर यांनी सांगितले की, भरत कदम यांचा खून कोणत्या कारणामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झाले नाही. घटनास्थळावर त्यांची दुचाकी तसेच त्यांचा मोबाईल, पाकीट जसेच्या तसे होते़ त्यावरुन चोरीसाठी हा प्रकार घडलेला दिसून येत नाही. भरत कदम हे गारवा बिर्याणी येथे मॅनेजर म्हणून काम करत होते. शनिवारी रात्री काम संपल्यानंतर ते दुचाकीवरुन घरी जात होते. यावेळी धायरेश्वर मंदिर ते पारे कंपनी चौक रस्त्यावरील निर्मिती असोसिएटस बिल्डिंगच्या समोरील गायकवाड यांच्या रिकामे प्लॉट येथे हल्लेखोरांनी भरत कदम यांना अडविले. कोणत्यातरी हत्याराने त्यांच्या डोक्यात वार केले. त्यात ते तेथेच जखमी अवस्थेत पडले. त्यानंतर हल्लेखोर पळून गेले. याची माहिती धायरी मार्शल यांना मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास मिळाली. सिंहगड रोड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तेव्हा भरत कदम यांचा मृत्यु झाल्याचे दिसून आले. सिंहगड रोड पोलीस तपास करीत आहेत.
News - Rajy




Petrol Price




