निवेदनातून अनिल साधवानी यांनी नप प्रशासनाचे वेधले लक्ष
विदर्भ न्युज एक्सप्रेस
प्रतिनिधी / देसाईगंज : व्यापाराचे केंद्र म्हणून ओळख असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज शहरातील सिंधी, नंदनवन व लेबर आदी तीन वसाहती मागील १० वर्षापासून उपेक्षित राहिली आहे. विशेषतःसिंधी वसाहतीतून सर्वाधिक कर नगर परिषद प्रशासनाला प्राप्त होत असताना या वसाहतीत कोणत्याची सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यात न आल्याने प्रशासनाप्रती वसाहतीतील नागरिकांमध्ये रोष व्यक्त होत आहे. त्यामुळे या तिन्ही वसाहतीतील विविध समस्यांना घेऊन संकल्प सेवा समितीच्या पदाधिकाऱ्यांना निवेदन सादर करीत लक्ष वेधले. व्यापारशहर म्हणून ओळख असलेल्या देसाईगंज नगर परिषदे अंतर्गत येत असलेल्या सिंधी, नंदनवन व लेबर वसाहतीत हजारो नागरीक वास्तव्याने आहेत. मात्र या वसाहतीत मागील दहा वर्षांपासून कोणतीच विकासात्मक कामे करण्यात न आल्याने रहिवासी अनेक समस्यांच्या गर्तेत अडकून पडली आहेत. विशेष म्हणजे सिंधी वसाहतीतून प्रशासनाला सर्वाधिक कर प्राप्त होत आहे. अशास्थितीत या वसाहतीत अनेक विकासकामे अडकून पडली आहेत.परिणामी सिंधी वसाहतीसह नंदनवन, लेबर वसाहतीतील रहिवासीयांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. रहिवासीयांच्या या समस्यांना घेऊन संबंधित वसाहतीतील नागरिकांना न्याय द्यावा,अशी मागणी करीत संकल्प सेवा समितिचे अध्यक्ष अनिल साधवानी, कृष्णा उईके यांनी मुख्याधिकारी यांची भेट घेत निवेदन सादर केले. १० वर्षांपासून वसाहतीत रस्त्याची निर्मितीच नाही : स्थानिक नगर परिषद अंतर्गत येणाऱ्या सिंधी, नंदनवन व लेबर वसाहतीतील रस्त्यांची दयनीय स्थिती झाली आहे. मागील १० वर्षांपासून या वसाहतीत रस्त्याची निर्मिती करण्यात आलेली नाही. यासोबतच कोणतीही विकासकामे या भागात झालेली नाहीत. नाल्यांच्या उपशाअभावी पावसाळ्यात नाल्यातील
सांडपाणी रस्त्यावरुन वाहत असते. यामुळे नाल्याही दिसून येत नसल्याने अपघाताची शक्यता बळावली आहे. संबंधित तिन्ही वार्डात तसेच बाजारपेठेत नाल्यांवर झाकण लावले नसल्याने सदर नाल्या अपघातास आमंत्रण देत आहेत. तसेच आंबेडकर शाळेलगत असलेल्या मोठ्या नालीवर ब्रिज उभारण्यात यावे, अशी मागणी यावेळी निवेदनातून करण्यात आली.
News - Gadchiroli