बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा : राज्यात येलो अलर्ट जारी
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वुत्तसंस्था / मुंबई : मागच्या चार दिवसांपासून बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने तामीळ नाडू, आंध्रप्रदेशच्या किनारपट्ट्यांवर जोरदार पाऊस होत आहे. दरम्यान झालेल्या वादळाचा परिणाम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये होत आहे. चक्रीवादळाचा परिणामामुळे राज्यातील काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. दरम्यान पुढचे दोन दिवस अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. चक्रीवादळाचा जोर कमी झाल्यानंतर पुन्हा उत्तर केरळ ते मध्यपूर्व अरबी समुद्रापर्यंत चक्रीय स्थिती तयार झाली आहे. उत्तर केरळ ते मध्य पूर्व अरबी समुद्रापर्यंत तयार झालेली चक्रीय स्थिती तसेच 13 डिसेंबरला किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा तयार होणार आहे. या दोन्ही स्थितीमुळे राज्यातील कोल्हापूर, सातारा, पुणे, नाशिक, औरंगाबाद, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, बीड या भागांत हवामान विभागाने यलो अलर्ट जाहीर केला असून मंगळवारी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. या दोन्ही स्थितीच्या प्रभावामुळे कोकणातील सिधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, पुणे, नाशिक, मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड या भागात यलो अलर्ट जारी केला आहे. या भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. मात्र, बुधवार पासून पाऊस कमी होणार आहे. तुरळक ठिकाणीच पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
चालू आर्थिक वर्षात पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. खरीप हंगामाच्या सुरुवातीला अनेक भागात पाऊसच झाला नाही, त्यामुळे पेरणीला विलंब झाला. पेरणी झाल्यानंतर राज्याच्या अनेक भागात अतिवृष्टी झाली. अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका हा विदर्भ आणि मराठवाड्याला बसला. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढावलं. त्यानंतर ऐन हातातोंडाशी घास आला असताना पुन्हा अतिवृष्टी झाल्यानं शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. आता अवकाळी पाऊस झाल्यास याचा मोठा फटका रब्बी पिकांना बसण्याची शक्यता आहे.
News - Rajy