अन्न आणि पोषण सुरक्षा पौष्टिक तृणधान्य जनजागृती कार्यशाळा
विदर्भ न्युज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : अन्न आणि पोषण सुरक्षा पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३-२४ निमित्याने तसेच पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्व, त्यातील पोषण मुलद्रव्ये आणि पौष्टिक तृणधान्याचा आहारात वापर होण्याच्या दृष्टीने उपविभागीय कृषि अधिकारी, आर्वी यांच्या मार्फत नुकतीच फळरोपवाटीका तळेगाव येथे अन्न आणि पोषक सुरक्षा पौष्टिक तृणधान्य व गळीत धान्य अंतर्गत जनजागृती कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
आर्वीच्या उपविभागीय कृषि अधिकारी रेश्मा कोथळकर, आर्वीचे तालुका कृषी अधिकारी रवींद्र उघाडे, कारंजाचे तालुका कृषी अधिकारी रमेश देशमुख, डॉ. युगांधर नारकर, उमेदच्या भाग्यश्री लाटकर यांच्यासह शेतकरी, आष्टी, आर्वी व कारंजा तालुक्यातील बचत गटातील महिला उपस्थित होत्या.
डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन दीप प्रज्वलनाने कार्यशाळेची सुरूवात झाली. कार्यशाळेच्या प्रथम सत्रात डॉ. युगांधर नारकर व भाग्यश्री लाटकर यांनी पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्व व आरोग्य याविषयी मार्गदर्शन केले. दुसऱ्या सत्रात तालका कृषि अधिकारी रमेश देशमुख यांनी सोयाबीन, करडी, तेलबिया लागवड, संरक्षित शेती अंतर्गत शेडनेट, पॉलीहाऊस, पॉली टनेल याविषयावर उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आर्वीच्या उपविभागीय कृषि अधिकारी रेश्मा कोथळकर यांनी केले. संचालन तंत्र अधिकारी शुभांगी खेरे यांनी केले तर उपस्थितांचे आभार आष्टीचे कृषी अधिकारी संदीप सरोदे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कृषि सहाय्यक अमोल सोनटक्के, आष्टीच्या कृषि सहाय्यक कौसल्या मुसळे तसेच कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
News - Wardha