किसान सम्मान निधीच्या १४ व्या हप्त्याचे शेतकऱ्यांना वाटप
- वाटपाचे जिप सभागृहात थेट प्रक्षेपण
- देशभर १७ हजार ५०० कोटी जमा
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या १४ व्या हप्त्याचे वितरण आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. वर्धा जिल्हा परिषदेच्या सिंधुताई सपकाळ सभागृहात वितरणाचे थेट प्रसारण करण्यात आले. प्रति शेतकरी ६ हजार याप्रमाणे हा हप्ता जमा करण्यात आला आहे.
पीएम किसान सन्मान योजनेनुसार शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी ६ हजार रुपये जमा केले जातात. शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम तीन टप्प्यात पाठवली जाते. आतापर्यंत या योजनेंतर्गत १३ हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात आले होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याहस्ते आज ८.५ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये १४ वा हप्ता म्हणजेच १७ हजार ५०० कोटीची रक्कम हस्तांतरित करण्यात आली.
हा कार्यक्रम राजस्थान येथील सिकर येथून प्रसारित करण्यात आला. जिल्ह्यातील प्रत्येक गावी, प्रत्येक तालुक्यात त्याचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या सभागृहात जिल्हा प्रशासनांतर्गत कृषि विज्ञान केंद्र, कृषि विभाग, जिल्हा परिषद व राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर यांच्या संयुक्त विद्यमाने प्रक्षेपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अविनाश देव, मिलिंद भेंडे, आत्माच्या प्रकल्प संचालक डॉ. नलिनी भोयर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी प्रभाकर शिवणकर, वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. जीवन कतोरे, आरसीएफचे सुयोग देशमुख यांच्या निदर्शनाखाली करण्यात आला. पीएम किसान योजनेची रक्कम मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना ई-केवायसी अनिवार्य करण्यात आली आहे. ई-केवायसी केली नसेल तर शेतकऱ्यांना रक्कम मिळणार नाही. पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन मोबाईल क्रमांक आणि आधार क्रमांक नोंदवून ई-केवायची प्रक्रिया पूर्ण केली जाऊ शकते. याशिवाय सीएससी केंद्रावर जाऊन देखील शेतकरी ही प्रक्रिया करु शकतात.
News - Wardha