महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या निष्काळजीपणामुळे हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात : अभाविप
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ३० एप्रिल, २०२३ रोजी घेण्यात येणाऱ्या संयुक्त पूर्व परीक्षेच्या ९० हजारापेक्षा जास्त उमेदवारांचे प्रवेशपत्र ऐका टेलिग्राम चॅनेल वर प्रसिद्ध झाले असून, या चॅनेल मार्फत प्रश्नपत्रिका देखिल उपलब्ध असण्याचा दावा करण्यात आलेला आहे. ३० एप्रिल रोजी होणाऱ्या परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच प्रश्नपत्रिका देखिल फुटल्याचा दाव्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये खळबळ उडाली असून, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग ही एक स्वायत्त संस्था असून महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य संस्थेच्या कामकाजावर अवलंबून आहे. परंतु अश्याप्रकारे विद्यार्थ्यांची वैयक्तिक माहिती खाजगी समाज माध्यमांच्यामार्फत प्रदर्शित झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सदर प्रकरणाची तातडीने चौकशी करून या प्रकरणातील आरोपींवर कायदेशीर कारवाई करावी. तसेच या प्रकरणाला जबाबदार अधिकाऱ्यांवर देखिल कडक कारवाई करण्यात यावी.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी लाखो विद्यार्थी अनेक वर्षांपासून करत असतात परंतु आयोगाच्या अश्या निष्काळजीपणामुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात जाऊ शकते. देशाचे भविष्य या विद्यार्थ्यांच्या हातात असते, अश्यातच विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात जाण्यापासून वाचविण्याकरिता राज्य सरकारने याची दखल घेत तात्काळ योग्य ती कार्यवाही करावी, असे मत अभाविप विदर्भ प्रदेश मंत्री शक्ती केराम यांनी व्यक्त केले.
News - Chandrapur