महत्वाच्या बातम्या

 शेतकऱ्यांसाठी दुदैवी प्रसंगात उपयोगी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : तुम्ही जर शेतकरी आहात… तर आपल्या स्वत:साठी आणि स्वत:च्या कुटुंबासाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ घेणे आवश्यक आहे. अत्यंत सोपी पध्दत व सुलभतेने हा लाभ मिळतो. अघटीत घडल्यास फक्त अर्ज करावा लागतो. नागपूर विभागात पहिल्या टप्प्यात एकूण 420 प्रस्तावांपैकी 213 प्रकरणांना मंजूरी मिळाली आहे. आतापर्यंत 425 लाख रुपयांचा निधी संबंधितांना वितरित करण्यात आला आहे.

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत अपघातग्रस्त शेतकरी व त्याच्या कुटुंबास शासनाकडून आर्थिक लाभ देण्यात येतो. याअंतर्गत शेती व्यवसाय करताना होणाऱ्या विविध अपघातांमुळे शेतक-यांचे दोन डोळे अथवा दोन हात किंवा दोन पाय निकामी झाल्यास दोन लक्ष रुपये तर एक डोळा अथवा एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास एक लक्ष रुपये अनुदान शासनाकडून देण्यात येते. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत आतापर्यंत अनेक शेतकरी व त्यांच्या कुटुंबियांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. शेतकऱ्यांनी या योजनेचा जास्तीत जास्त संख्येने लाभ घ्यावा, असे विभागीय कृषी सहसंचालक  यांनी आवाहन केले आहे.


अनुदानाचे स्वरुप : शेती व्यवसाय करतांना विविध अपघातामुळे शेतक-यांचा मृत्यू झाल्यास दोन लक्ष रुपये अनुदान देण्यात येते. तसेच अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन हात किंवा दोन पाय निकामी झाल्यास दोन लक्ष तर एक डोळा अथवा एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास एक लक्ष रुपये अनुदान देण्यात येते.


खंडीत कालावधी : अपघाती मृत्यूप्रकरणी शेतक-याच्या देण्यात येते. कुटुंबाला शासकीय अनुदान देण्याकरिता शासनाकडून एका वर्षाच्या कालावधीकरिता विमा कंपनीची नियुक्ती केली जाते. सदर विमा कालावधी संपुष्टात आल्यावर दुस-या कंपनीची नियुक्ती होईस्तोवर सदर कालावधी हा खंडीत म्हणून व्यवसाय गृहित पकडला जातो. अशा कालावधीत विमा दावे आयुक्तालय स्तरावर सादर करण्यात येतात.


समाविष्ट असलेले अपघात : रस्ता/ रेल्वे अपघात, उंचावरुन पडून मृत्यू, पाण्यात बुडून मृत्यू, नक्षलवाद्यांकडून होणाऱ्या हत्या, सर्पदंश, विंचू दंश, वीज पडून मृत्यु, इलेक्ट्रिक शॉक, अपघाती विषबाधा, जनावरांच्या हल्ल्यामुळे किंवा किंवा चावल्यामुळे होणारे अपघाती मृत्यु इत्यादी. अपघातामुळे शेतकऱ्याचा मृत्यु किंवा अपंगत्व आल्यास वारसदारांना लाभ देण्यात येतो.


आवश्यक कागदपत्रे : हा विमा शासन स्वत:च काढते मात्र दुर्घटना घडल्यास अर्ज करावा लागतो अर्ज करतांना क्लेम फॉर्म भाग 1 व सहपत्र, भाग 2 (अ) व (ब), क्लेम फॉर्म भाग 3, सातबारा उतारा, 6 क (वारस नोंद उतारा), 6 ड (फेरफार उतारा), वयाचा पुरावा(स्वयंसाक्षांकित प्रत),  शिधापत्रिका (स्वयंसाक्षांकित प्रत ), मृत्यू दाखला / अपंगत्वाचा दाखला (स्वयंसाक्षांकित प्रत), प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) (स्वयंसाक्षांकित प्रत), घटनास्थळ पंचनामा (स्वयंसाक्षांकित प्रत), पोलीस पाटील माहिती अहवाल (एफआयआर नसल्यास), इन्क्वेस्ट पंचनामा, शवविच्छेदन अहवाल, व्हिसेरा अहवाल (आवश्यक असल्यास) वाहन परवाना, बँक पासबुक (झेरॉक्स प्रत), अपंगत्वाच्या टक्केवारीचे प्रमाणपत्र व फोटो, नावात/आडनावात बदल असल्यास प्रतिज्ञापत्र आदी अर्जासोबत जोडावे लागते.


 योजनेंतर्गत केवळ सातबारावर नाव असलेल्या संबंधित व्यक्तीलाच नव्हे तर सातबारावर नाव नसलेल्या कुटुंबातील इतर सदस्याचा अपघात किंवा अपंगत्व आल्यास वरील प्रमाणे लाभ देण्यात येतो. त्यामुळे 2018-19 पासून या योजनेत अपघातप्रकरणी फक्त सातबाराधारक सदस्य गृहीत न  धरता संपूर्ण कुटुंबाला संरक्षित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे कुटुंबाला संरक्षित करण्याचा धोरणात्मक निर्णय तत्कालीन अर्थमंत्री तथा पालकमंत्री यांच्या पुढाकाराने घेण्यात आला आहे.





  Print






News - Nagpur




Related Photos