पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत संपृक्तता साध्यतेसाठी २१ फेब्रुवारीपर्यंत विशेष मोहीम
- ई-केवायसी प्रमाणीकरण आवश्यक
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून सावरता यावे, त्यांना आर्थिक सहाय्य व्हावे या उद्देशाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना महत्त्वपूर्ण ठरली आहे. या योजनेच्या संपृक्तता साध्यतेसाठी राबविलेल्या विशेष मोहिमेत सुमारे १.९४ लाख शेतकऱ्यांचे ई-केवायसी व ३.०१ लाख स्वयंनोदंणीकृत शेतकऱ्यांची नव्याने नोंदणी करण्यात आली. तथापि राज्यातील एकूण १.९४ शेतकऱ्यांनी योजनेच्या लाभासाठी आवश्यक असलेल्या बाबींची पूर्तता केली असून त्यांचे केवळ ई- केवायसी बाकी आहे. या योजनेत समावेश व लाभासाठी ई- केवायसी प्रमाणीकरण आवश्यक असून सामाईक सुविधा केंद्रामार्फत ई-केवायसी प्रमाणीकरण करण्यासाठी २१ फेब्रुवारी २०२४ पर्यंत विशेष मोहीम हाती घेतल्याची माहिती कृषी विभागाने प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
विशेष मोहिमेंतर्गत ई-केवायसी प्रमाणीकरण करणे, योजनेसाठी नव्याने नोंदणी करणे, बँक खाती आधार क्रमांकाला जोडणे आदी बाबींची पूर्तता करण्यासाठी शेतकऱ्यांनी समक्ष हजर राहणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी ई- केवायसी प्रमाणीकरण करण्यासाठी मोबाईलवरील ओटीपी, सामाईक सुविधा केंद्र, पी.एम. किसान फेस ऑथेंटिकेशन यापैकी एका सुविधेचा वापर करावा. बँक खाती आधार संलग्न नसलेल्या शेतकऱ्यांनी नजीकच्या पोस्ट कार्यालयामध्ये आधार संलग्न खाते उघडावे.
पी.एम. किसान योजनेच्या १६ व्या हप्त्याचा लाभ या फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात वितरित करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी अधिक माहितीसाठी कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र मनोहरे यांनी केले आहे.
News - Nagpur