विद्यार्थ्यांनी रस्ता सुरक्षा नियमाचे पालन करावे व इतरांना नियमांचे पालन करण्यास प्रोत्साहीत करावे : खासदार रामदास तडस
- उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, वर्धा याच्या मार्फत १५ जानेवारी २०२४ ते १४ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत वर्धा जिल्हयात रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येणार
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : आपल्या देशात रस्ते अपघातमध्ये १ लाख ६८ हजार हून अधिक लोकांचा बळी घेतला आणि ४ लाख ४३ हजार हून अधिक जखमी किंवा कायमचे अपंग झालेले आहे, देशातील १८-४५ या वयोगटातील मृत्यूचे प्रमुख कारण रस्ते अपघात हे समोर आले आहेत, ज्यामुळे लाखो कुटुंबे उघडयावर पडलेली आहे. रस्ते अपघातामुळे होणाऱ्या मृत्यूंपैकी ६४ टक्के दुचाकी व पादचारी आहेत. त्यामुळे रस्ते सुरक्षा ही भारत सरकारसाठी उच्च प्राथमिकता आहे आणि या समस्येचे निराकरण करण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेण्यात आले आहेत त्यापैकी रस्ते सुरक्षा अभियान हा एक कार्यक्रम आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन तयार झालेले महामार्ग दळणवळणासाठी सोईचे ठरत असले तरी महामार्गावरील वाढत्या अपघाताचे प्रमाण मात्र चिंताजनक आहे. आजची तरुणाई जोशात वाहने चालवून स्वतःचा व इतरांचा जीव धोक्यात घालत आहे. तरुणांनी वाहन चालवितांना वाहतुक नियमांचे पालन करुन जबाबदारीचे भान ठेवावे. स्वतःसोबत कुंटूबिय आणि इतर व्यक्ती अडचणीत येणार नाही याची काळजी घ्यावी, तसेच विद्यार्थ्यांनी रस्ता सुरक्षा नियमाचे पालन करावे व इतरांना नियमांचे पालन करण्यास प्रोत्साहीत करावे, असे आवाहन खासदार रामदास तडस यांनी केले. ते रस्ता सुरक्षा अभियानाचे उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, वर्धा याच्या मार्फत १५ जानेवारी २०२४ ते १४ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत वर्धा जिल्हयात रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येणार आहे. रस्ता सुरक्षा अभियाचा उद्घाटन समारंभ न्यु आर्टस, कॉर्मस कॉलेज, धुनिवाले मठाजवळ, येथे १५ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटन रामदास तडस, सदस्य, लोकसभा वर्धा मतदार संघ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती नरेंद्र फुलझेले, अतिरिक्त जिल्हाधिकारी, वर्धा सतिश अंभोरे, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, वर्धा तसेच विवेक देशमुख, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, वर्धा इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
रस्ता सुरक्षा अभियानाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा नियमाचे पालन करण्याबाबत मार्गदर्शन केले. उपस्थित मान्यवरांनी रस्ता सुरक्षा नियमाचे पालन करण्याबाबत आवाहन करण्यात आले. उप प्रादेशिक परिवहन कार्यालया मार्फत १५ जानेवारी २०२४ ते १४ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत रस्ता विषयक विविध कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे मो. समीर मो. याकुब, यांनी सांगीतले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन, मेघल अनासाने, मोटार वाहन निरिक्षक, यांनी केले. तसेच उपस्थिताचे आभार अक्षय मालवे, सहाय्यक मोटार वाहन निरिक्षक, यांनी मानले. सदर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातील सर्व मोटार वाहन निरिक्षक, सहाय्यक मोटार वाहन निरिक्षक, यांनी परिश्रम घेतले. यावेळी या कार्यक्रमास मोठया संख्येने विद्यार्थी विद्यार्थीनी तसेच शिक्षक वृंद उपस्थित होते.
News - Wardha