सालोरी गावातील नागरिकांची विशाखा राजूरकर यांच्या पुढाकाराने पालकमंत्र्याकडे धाव
- यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत घरकुल देण्याची मागणी.
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपुर : वरोरा तालुक्यातील सालोरी या गावांत विमुक्त भटक्या जमातीच्या कुटुंबाची मोठी संख्या असून मागील वर्षी केवळ ९ लोकांची यादी मंजूर करण्यात आली होती. पण मंजूर यादी मधील काही लाभार्थी यांची पक्की घरे असून तेथील सरपंचांनी आपल्या संबंधित कुटुंबाची नावे लाभार्थी म्हणून शासनाकडे पाठवून एक प्रकारे या योजनेचा गैरफायदा घेतला आहे. कारण ज्या घरांची पाहणी केले. त्या घरांची एवढी भयंकर परिस्थित आहे की, एका एका घरात दोन दोन कुटुंब राहतात. कुणाच्या पडक्या भिंती, कुणाचे उडालेले छप्पर तर काहींचे ताटवे लावून कसे तरी उदरनिर्वाह करणारे कुटुंब यांची परिस्थिती सरपंच व तत्कालीन प्रशासन व्यवस्था यांनी बघून दखल घेतली नाही व घरकुल मंजुरी करिता यादी शासनाकडे पाठवली. त्यात प्राध्यान्यक्रम गोर गरीब पडक्या घरातील कुटुंबांना न देता स्वतःच्या जवळच्या नातेवाइकांना याचा लाभ दिला आहे. त्यामुळे सालोरी गावातील गरजू, गरीब कुटुंबांना त्वरीत घरकुल मंजूर करा. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता विशाखा राजूरकर यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार व जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनातून केली आहे.
विशाखा राजूरकर यांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आपण नेहमीच गोरगरिबांना आधार देता व एक प्रकारे आपण जिल्ह्यातील जनतेचे पालक आहात त्यामुळे नव्याने ग्रामपंचायत आमसभेत मंजूर झालेल्या ७९ लाभार्थ्याची घरे यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजने अंतर्गत मंजूर करण्यासाठी शासनाकडे त्वरीत शिफारस करावी व सालोरी गावातील कुटुंबाना आधार द्यावा. अन्यथा गावातील सर्व लाभार्थ्याना घेऊन आंदोलन करावे लागेल. असा इशारा पण त्यांनी दिला. यावेळी मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे, विभाग अध्यक्ष संदीप मोरे, राजू रंदई, एकनाथ पडाल, राजेंद्र शिरपुरकर, गणेश तुमसरे, सुभाष दाते, दिलीप काळे, शारदा मोरे, जोशिला मोरे व इतर गावकरी उपस्थित होते.
News - Chandrapur