देसाईगंज व आरमोरी तालुक्यातील खाजगी धान्य व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना आमिष दाखवून सातबारे केले गोळा
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / देसाईगंज : देसाईगंज व आरमोरी तालुक्यातील खाजगी धान्य व्यापाऱ्यांनी शेतकरी बांधवाना पैस्याचे आमिष दाखवून सातबारे गोळा केले असून शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर धान्य खरेदी केंद्रावर शासनाच्या निर्धारित दरानुसार हमीभावाने धान्य विक्री करून काही कालावधीतच लाखोंची कमाई करण्याचा गोरखधंदा सुरू केला असल्याने अशांवर आळा घालणार कोण? असा सवाल उपस्थित केला जातो आहे. हल्ली शेतकरी बांधवांना पुराचा फटका, तुडतुडा व किडीच्या प्रादुर्भावामुळे पाहिजे त्या प्रमाणात धान्य झाले नाही. मात्र शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर भरपूर क्विंटल धान्य विक्री केले जाते आहे. सदर धान्य शेतकऱ्यांचे नसून व्यापारी वर्गांचे असतात. शेतकरी बांधव सततची नापिकी, अवकाळी पाऊस, गारपीट, किडीचा प्रादुर्भाव यामुळे त्रस्त झाला आहे. अशातच पाहिजे त्या प्रमाणात उत्पादन होत नाही. शेतीसाठी लागणारे खर्च जास्त व उत्पादन कमी यामुळे काय करावे? असा विचार शेतकरी बांधवांच्या मनात घर करून सोडतो. याचाच फायदा खाजगी धान्य व्यापारी घेत असतात. शेतकरी बांधवांच्या एका सातबऱ्यासाठी खाजगी धान्य व्यापारी दोन ते तीन हजार रुपये देतात. मात्र खाजगी धान्य व्यापारी शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर बोनसच्या स्वरूपात लाखो रुपयांची कमाई काही कालावधीतच करीत आहेत. शेतकरी बांधवांच्या हलाख्याच्या परिस्थितीचा फायदा खाजगी धान्य व्यापारी घेऊन शासनाला लाखोचा चुना लावण्याचा काम व्यापारी करत आहे. ज्या गावांना पुराचा फटका बसला अशा गावांतून व आजूबाजूच्या परिसरातील गावांतून खाजगी धान्य व्यापाऱ्यांनी सर्वात जास्त सातबारे गोळा करून धान्य विक्री करणे सुरू केले आहे. पुराचा फटका, किडीचा प्रादुर्भाव व ज्यांना कमी धान्य झाले आहे. अशांची यादी घेऊन भांडाफोड करण्यात येणार आहे.
News - Gadchiroli