५ हजारावर पूरग्रस्तांच्या खात्यामध्ये सानुग्रह अनुदान जमा
- दररोज टप्प्याटप्प्याने निधी जमा होणार
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : नागपूर महानगरात २३ सप्टेंबरला झालेल्या ढगफुटी सदृश्य मुसळधार पावसाने क्षतीग्रस्त झालेल्या नागरिकांच्या खात्यामध्ये गुरुवार ५ ऑक्टोबरपासून दहा हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान जमा होणे सुरु झाले आहे. दररोज टप्प्याटप्प्याने निधी जमा होईल, असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
आतापर्यंत २२ हजार ८३४ पंचनामे पूर्ण झाले असून जवळपास ही प्रक्रिया पूर्ण झाली आहे. काही ठिकाणी सुटलेल्या घरांचे पंचनामे पुन्हा सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले.
२३ सप्टेंबरला महानगरात निर्माण झालेल्या परिस्थितीचे पंचनामे करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महानगरपालिका प्रशासनाची मदत घेतली आहे. सर्व भागातील पंचनामे तातडीने पूर्ण व्हावे, यासाठी सध्या ५० चमू कार्यरत आहेत. जवळपास १८० कर्मचारी दररोज युद्धपातळीवर पंचनामाचे काम करत आहे.
दरम्यान, ज्यांचे पंचनामे झाले नाही त्यांनी संयम ठेवावा. प्रशासनाकडून सर्वांचे पंचनामे करण्यात येईल, तसेच पंचनामा झालेल्या परिवाराच्या खात्यामध्ये सानुग्रह निधी टप्प्याटप्प्याने जमा होईल. प्रत्येकाच्या खात्यात हा निधी टप्प्याटप्प्याने जमा होणार आहे. याबद्दल कोणत्याही अफवांना बळी पडू नये, असेही जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
News - Nagpur