महत्वाच्या बातम्या

 बल्लारशाह रेल्वे स्थानकाचा कायापालट वेगाने : पुनर्विकासाचे ५० टक्के काम पूर्ण


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत बल्लारशाह रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाचे काम आता वेगाने सुरू असून आतापर्यंत सुमारे ५० टक्के काम पूर्ण झाले आहे. स्थानकाचा मुख्य प्रवेशमार्ग, रस्ते, नाल्या, संरक्षक भिंत, फलाट, प्रवासी निवास, तिकीट कार्यालय, वाहनतळ आणि पादचारी पुलासह विविध कामांना गती देण्यात आली आहे. उर्वरित कामे जानेवारी २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट रेल्वे प्रशासनाने ठेवले आहे.

माजी मंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे बल्लारशाह स्थानकाच्या पुनर्विकासाच्या कामांना गती मिळाली आहे. मुनगंटीवार यांनी यापूर्वी स्थानकाला भेट देऊन कामांची पाहणी केली होती. कामाची संथ गती लक्षात घेता त्यांनी रेल्वे प्रशासनाकडे नाराजी व्यक्त करून कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्याची मागणी केली होती. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव तसेच मंडल रेल्वे व्यवस्थापक विनायक गर्ग यांच्यासोबतच्या चर्चेतही त्यांनी हा विषय मांडला होता.

या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे अपर मंडल रेल्वे व्यवस्थापक अमोल कुमार पिंगळे यांनी कामांच्या प्रगतीबाबत अहवाल दिला आहे. दरम्यान, मध्य रेल्वेच्या विभागीय रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य तथा स्पॉट चेक समितीचे सदस्य अजय दुबे यांनी बल्लारशाह स्थानकाला भेट देऊन सुरू असलेल्या कामांची प्रत्यक्ष पाहणी केली.

स्थानकाच्या मुख्य प्रवेशमार्गाच्या दिशेने ५९० मीटर रस्त्याचे बांधकाम पूर्ण झाले स्थानक परिसराच्या विकासासाठी रेल्वे निवासस्थानांचे पुनर्व्यवस्थापन करण्यात आले असून चार आरबी-३ आणि सहा आरबी-२ प्रकारच्या निवासस्थानांचे बांधकाम पूर्ण झाले आहे.

प्रवाशांच्या सोयीसाठी फलाटांवर आठ नवीन छत उभारण्यात आले आहेत. फलाट क्रमांक ४ मध्ये चेकर्ड फरशीने नूतनीकरण करण्यात आले आहे. फलाट क्रमांक ४ आणि ५ वरील पृष्ठभागाचे कोटा दगडाने नूतनीकरण करण्यात आले आहे. फलाट क्रमांक १ वरील जुनी स्वच्छतागृहे तसेच विद्यमान तिकीट कार्यालयातील स्वच्छतागृहांचे नूतनीकरण पूर्ण झाले आहे.

नवीन तिकीट कार्यालयाचे बांधकाम तथा नवीन वाहनतळातील पीसीसीचे काम पूर्ण झाले आहे. १२ मीटर रुंदीच्या पादचारी पुलासाठी पायाभूत कामे  स्थानकावरील तसेच दिशादर्शक फलक आणि स्थानकाच्या नावाचे फलक बसविण्याचे कामही पूर्ण झाले आहे.

गोल पुलियाकडूनही मिळणार प्रवेश -
बल्लारशाह स्थानकाच्या पुनर्विकासातील महत्त्वाचा भाग म्हणजे रेल्वे चौकासोबतच गोल पुलियाच्या दिशेने प्रवाशांसाठी आणखी एक प्रवेशमार्ग उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे सध्याच्या मुख्य प्रवेशमार्गावरील प्रवासी व वाहनांची गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे. नव्या प्रवेशमार्गामुळे स्थानकात ये-जा करणाऱ्या प्रवाशांना अधिक सुलभ सुविधा उपलब्ध होणार आहेत.

बल्लारशाह स्थानकाच्या पुनर्विकासाचे आतापर्यंत सुमारे ५० टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित कामांना गती देण्यात आली आहे. जानेवारी २०२७ पर्यंत संपूर्ण पुनर्विकासाचे काम पूर्ण करण्याचे नियोजन रेल्वे प्रशासनाने केले आहे. त्यामुळे येत्या काळात बल्लारशाह रेल्वे स्थानक आधुनिक स्वरूपात प्रवाशांच्या सेवेत येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.





  Print






Related Photos