दिल्लीच्या अमृतवाटिकेत जाणार भंडाऱ्याची माती : ९ ते ३० ऑगस्टदरम्यान मेरी मिट्टी-मेरा देश उपक्रम
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत ९ ते ३० ऑगस्टदरम्यान सर्व पंचायत समिती आणि ब्लॉकस्तरावर मेरी मिट्टी - मेरा देश या विषयावर कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाची सांगता दिल्लीच्या कर्तव्य पथावर होणार आहे. कार्यक्रमासाठी भंडारा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून नेहरू युवा केंद्राच्या एका प्रतिनीधीव्दारे माती गोळा केली जाणार असून ही माती एकत्रित करत एका कलशातून दिल्लीच्या कर्तव्य पथावर नेली जाणार आहे. तेथे प्रत्येक जिल्ह्यातून आलेल्या मातीतून अमृतवाटिका बाग तयार केली जाणार आहे.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम होणार आहे.देशभरातून ७ हजार ५०० युवक या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. आज जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा समन्वय समिती, सार्वजनिक उत्कृष्ट गणेश मंडळ पुरस्कार, तसेच स्वातंत्रयाचा अमृतमहोत्सव अंतर्गत मेरी मिटटी, मेरा देश या अभियानाबाबतचा आढावा घेतला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी लिना फलके यांच्यासह सर्व विभागप्रमुख हजर होते.
काय आहे मेरी मिटटी, मेरा देश अभियान - ९ ऑगस्ट ते ३० ऑगस्टपर्यंत मेरी मिटटी, मेरा देश अभियान राबविण्यात येईल. यामध्ये १६ ते २५ ऑगस्ट या कालावधीत ग्रामीण व शहरी भागात कार्यक्रम राबविण्यात येतील. नेहरू युवा केंद्राचे स्वयंसेवक ब्लॉकस्तरावर जाऊन गावोगावी माती गोळा करुन ती २५ ऑगस्टपर्यंत ठराविक ठिकाणी जमा करणार व २७ ऑगस्टपर्यंत ही माती दिल्लीत कर्तव्यपथावर नेण्यात येणार त्यानंतर ३० ऑगस्टला कर्तव्य पथावर समारोप समारंभ होणार आहे.
स्वातंत्र्यसैनिकांचा सन्मान - ग्रामीण भागात ९ ते १५ ऑगस्टपर्यंत होणाऱ्या कार्यक्रमांत स्वातंत्र्यसैनिकांचा सन्मान केला जाणार आहे. जे स्वातंत्र्यसैनिक हयात नाहीत त्यांच्या कुटुंबियांचा सत्कार होईल. सैन्य आणि पॅरा लष्कराशी निगडित लोकांचा सन्मान करण्यात येणार आहे. याचबरोबर अमृत सरोवराच्या काठी किंवा गावातील शिलालेखांवर त्यांची नावे लिहून पंचायत इमारत व शाळेत बसवण्यात येणार आहे. शिवाय, प्रत्येक गावात ७५ झाडे लावण्याचा कार्यक्रमही होणार आहे. यासाठीचे नियोजन उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत उमेश नंदागवळी यांनी करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. तसेच यामध्ये लोकसहभाग घेण्यासाठी गावपातळीवर बैठका घेउून नागरिकांना माहिती देण्याचे ही त्यांनी सूचित केले.
News - Bhandara