महत्वाच्या बातम्या

 आत्तापर्यंत राज्यात २०.६० लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी : दुष्काळ निवारणासह खरीपा संदर्भास बैठक


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / मुंबई : राज्यात आत्तापर्यंत २०.६० लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. पुढील काही दिवसांत यात आणखी भर पडण्याची अपेक्षा कृषी अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. महाराष्ट्रातील दुष्काळ निवारण सज्जता, खरीपाची कामे आणि केंद्र सरकार पुरस्कृत तसेच केंद्र सरकारी विभागांच्या योजनांची आढावा बैठक घेण्यात आली.

यावेळी अधिकाऱ्यांनी पाऊस आणि सध्याची पेरणीची स्थिती याबाबत सविस्तर माहिती दिली. राज्यात सरासरीपेक्षा ३९ टक्के कमी पाऊस पडला आहे. मात्र, जुलै महिन्यात, राज्यात उच्चांकी पाऊस होईल असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला.

महाराष्ट्रातील दुष्काळ निवारण व्यवस्था, खरीपाच्या पेरण्यांची प्रगती आणि इतर कामांचा आढावा घेण्यासाथी केंद्र सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण (विस्तार) विभागाचे सहसचिव, सॅम्युअल प्रवीण आणि महाराष्ट्रातील कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांच्या सह-अध्यक्षतेखाली, पुण्यात बैठक झाली. या बैठकीत, प्रमुख विषयांसह, विविध केंद्र पुरस्कृत योजनांचा तसेच कृषी शी निगडीत विविध केंद्रीय विभागांच्या योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला. या बैठकीला राज्यातील सर्व नोडल अधिकारी देखील उपस्थित होते. सोयाबीन आणि कापसा पाठोपाठ, कडधान्ये आणि धान ही राज्यातील प्रमुख खरीप पिके आहेत. केंद्रीय योजनांच्या अंमलबजावणीबाबत, महाराष्ट्र राज्याने थेंबा थेंबात अधिक शेती योजनेची प्रभावी अंमलबजावणी केली आहे. २०२२-२३ या वर्षात, या योजने अंतर्गत १ लाख २७ हजार ६२७ लाभार्थी शेतकऱ्यांना अनुदान वितरीत करण्यात आले असून १ लाख १२ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली आणण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

राज्यात उच्चांकी पाऊस होईल : हवामान विभागाचा अंदाज 

हवामान शास्त्र विभाग, पुणे चे अतिरिक्त महसंचालक के. एस. होसाळीकर आणि हवामान वैज्ञानिक डॉ. एस. डी सानप यांनी जुलै २०२३ साठी राज्यातील मोसमी पावसाची स्थिती आणि अंदाज यांची माहिती दिली. आजच्या तारखेला राज्यात सरासरीपेक्षा ३९ टक्के कमी पाऊस पडला आहे. मात्र, जुलै महिन्यात, राज्यात उच्चांकी पाऊस होईल, असा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे. कोकण विभागात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला असला, तरी मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात मात्र पावसाने ओढ दिली आहे. येत्या दोन आठवड्यात, राज्यात सगळीकडे, सरासरी किंवा त्यापेक्षा जास्त पाऊसमान असेल, हे अनुमान आशादायक आहे.

केंद्राकडून आलेल्या सर्व सूचनांचे तंतोतंत पालन करावे -

या बैठकीत, राज्याच्या कृषी विभागाचे संचालक दिलीप झेंडे यांनी राज्यातील कृषीविषयक कामे, विशेषतः मुख्य पिके, पेरण्या आणि महाराष्ट्रात राबवल्या जाणाऱ्या कृषी योजना, यांची माहिती देणारे सविस्तर सादरीकरण केले. तसेच राज्यात दुष्काळ सदृश परिस्थिती उद्भवल्यास, त्याचा सामना करण्यासाठी काय सज्जता आहे, या उपाययोजनांचा आढावा घेतला. दुष्काळी परिस्थितीच्या सज्जतेविषयी केंद्राकडून आलेल्या सर्व सूचनांचे तंतोतंत पालन करून त्याची सज्जता केली जात आहे. तसेच, गरजेनुसार पुढेही आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातील, असेही असेही झेंडे यांनी सांगितले.

महाराष्ट्रात, २५ जून ते १ जुलै २०२३ या कालावधीत, कृषी संजीवनी सप्ताह साजरा करण्यात आला, अशी माहितीही त्यांनी दिली. या सप्ताहात, मृदा आरोग्य, कृषी तंत्रज्ञान, या क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान अशा विषयांवर शेतकऱ्यांना माहिती देण्यासाठी अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. कृषी दिन म्हणजे वसंतराव नाईक यांच्या जयंतीदिनी एक जुलैला ह्या सप्ताहाची सांगता झाली, अशी माहिती झेंडे यांनी दिली. अपुऱ्या पावसामुळे राज्यात उद्भवू शकणारी दुष्काळसदृश परिस्थिती हाताळण्याच्या दृष्टीने, आणि सर्व आकस्मिक उपाययोजना सुव्यवस्थित करण्याच्या दृष्टीने ही बैठक महत्वाची ठरली.





  Print






News - Rajy




Related Photos