गडचिरोली जिल्ह्यातील २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करु नये : प्राथमिक शिक्षक संघाची निवेदनाद्वारे मागणी
विदर्भ न्युज एक्सप्रेस
प्रतिनिधि / गडचिरोली : नविन भरती करण्याऐवजी २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करुन तेथील शिक्षकांचे आवश्यक ठिकाणी समायोजन करावे. याबाबतची माहीती शासनाने मागवली आहे. त्यामुळे २० पेक्षा कमी पटसंख्येंच्या शाळा बंद होणार अशी भिती निर्माण होऊन शैक्षणिक वर्तुळात तीव्र नाराजी पसरली आहे. २० पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याच्या निर्णयामुळे गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी गोरगरिब, वंचित, उपेक्षित, दुर्गम, अतिदुर्गम, जंगलव्याप्त वस्तीवरील विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबण्याची शक्यता आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता बळावली आहे. तसेच २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद केल्यानंतर या भागातील मुलांना दुर अंतरावरील शाळांमध्ये जावुन शिक्षण घेणे अडचणीचे ठरु शकते. परिणामी त्यामुळे अशा भागातील मुले शिक्षणाच्या सोईपासुन वंचीत राहण्याची शक्यता आहे. म्हणुन वरील सर्व बाबींचा व गडचिरोली जिल्ह्यातील भौगौलिक परिस्थितीचा विचार करुन गडचिरोली जिल्ह्यातील २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करु नये. अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा शाखा गडचिरोली च्या वतीने मुख्यमंञी एकनाथ शिंदे, उपमुख्यमंञी तथा पालकमंञी देवेंद्र फडणवीस, शालेय शिक्षण मंञी दिपक केसरकर, सचिव शालेय शिक्षण विभाग रणजितसिंग देओल, जिल्हाधिकारी संजय मिना यांचेकडे केली आहे. जिल्ह्यातील २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करु नये. यासंदर्भातील निवेदन १४ ऑक्टोबर २०२२ ला निवासी उपजिल्हाधिकारी तथा अप्पर जिल्हा दंडाधिकारी समाधान शेंडगे यांचेकडे देण्यात आले आहे. याप्रसंगी निवेदन देतांना महाराष्टृ राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष रघुनाथ भांडेकर, जिल्हा कार्याध्यक्ष शिला सोमनकर, जिल्हा कोषाध्यक्ष राजेश चिल्लमवार, जिल्हा उपाध्यक्ष सुरेश वासलवार, अशोक रायसिडाम जिल्हा सल्लागार निलकंठ निकुरे, विनोद खोब्रागडे तालुकाध्यक्ष गडचिरोली धनेश कुकडे, धानोरा येथील राजु मुंडले, एटापल्ली येथील तेजराज नंदगिरवार, तालुका कार्याध्यक्ष मुलचेरा अशोक बोरकुटे, संघटक बालाजी पवार, नाईकवाडे, नुदनुरे, अंबादास पाल आदी पदाधिकारी उपस्थित होते.
News - Gadchiroli