महत्वाच्या बातम्या

 शहीद भूमी आष्टी येथे साकारणार स्मारक


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : 
राष्ट्रपिता महात्मा गांधी सेवाग्राम येथे दिर्घकाळ वास्तव्यास होते. 1942 चा भारत छोडो आंदोलनाचा ठराव वर्धा येथेच पारीत झाला आणि देशभर चलो जावो चा नारा गुंजला. गांधीजींच्या नेतृत्वात सुरु झालेला हा लढा स्वातंत्र्य प्राप्तीसाठी महत्वाचा ठरला. गांधीजींच्या आवाहनाला प्रतिसाद देत आष्टी येथे घडलेल्या संग्रामाच्या स्मृती जागृत ठेवण्यासाठी स्मारक उभारले जाणार आहे. देशभर चलो जावो या आंदोलनाचे पडसाद उमटले होते. इंग्रजांना सडो की पळो करून सोडणारा हा लढा वर्धा जिल्ह्यात देखील देशभक्तांनी प्राणपणाने लढविला.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या प्रेरणेने आष्टी येथे घडलेला स्वातंत्र संग्राम अजूनही देशभक्तीचे जाज्वल्य आपल्या समोर उभे करते. गांधीजींनी भारत छोडोची हाक दिल्यानंतर देशात ठिकठिकाणी इंग्रजांना चालते व्हा म्हणणारे लढे उभे राहिले. देशभर हजारो देशभक्त, पुढाऱ्यांना अटक झाली, तरीही न डगमगता हा लढा सुरुच राहील. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या राष्ट्रभक्तीपर भजनांनी प्रेरीत होऊन जिल्ह्यातील आष्टी येथे उभा राहिलेला हा लढा इतिहासात कायमस्वरूपी नोंदविला गेला.

झाड झडुले शस्त्र बनेंगे भक्त बनेंगी सेना पत्थर सारे बॉम्ब बनेंगे नाव लगेंगी किनारे

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची जाज्वल्य देशभक्ती जागविणारी अशी भजने गावोगावी होत होती. 12 ऑगस्ट रोजी आष्टीत महाराजांचे भजन झाले होते. जमलेल्या हजारो नागरिकांच्या मनात क्रांतीचे स्फूलिंग महाराजांनी चेतविले. लोकांमध्ये देशभक्तीची भावना रुजविण्यासोबतच इंग्रजांविरुध्द उठून उभे राहण्याची प्रेरणा राष्ट्रसंतांची भजने देत होती. त्याने प्रेरीत होऊन 16 ऑगस्ट रोजी आष्टी येथे झालेला संग्राम देशभर गाजला.   

आष्टी तालुक्यातील वडाळा या गावातून काही देशभक्त आष्टीकडे निघाले. ही माहिती आष्टी, खडकी, सिरसोली या गावांमध्ये पोहोचली. या गावातून देखील हजारो स्वयंसेवक आष्टी येथील तत्कालीन पोलिस ठाण्याच्या दिशेने निघाले. संपुर्ण परिसरात स्वयंसेवक निघाल्याची माहिती पोहोचल्याने गावागावाहून हजारोंचे जथ्थे आष्टीकडे निघाले. पोलिस ठाण्यात राष्ट्रध्वज फडकविण्याची मागणी देशभक्त करीत होते. ही मागणी धुळकावत इंग्रजांनी देशभक्तांवर गोळीबार केला. त्यात काही जण जखमी झाले तर वडाळा येथील तीन देशभक्तांना गोळ्या लागल्याने ते शहीद झाले. पुढे 16 देशभक्तांना इंग्रजांनी फासीची शिक्षा ठोठावली.

आष्टी येथे घडून आलेला हा संग्राम देशाच्या इतिहासात कायमचा कोरला गेला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आपल्या भजनांमधून केलेला लोकजागर, इंग्रजांविरुद्ध लोकांमध्ये चेतविलेले राष्ट्रप्रेम यासाठी कारणीभूत ठरले. या ऐतिहासिक भूमित देशभक्तांचे कायम स्मरण व्हावे, त्यांचे राष्ट्रप्रेम, जाज्वल्य देशभक्तीची भावना पुढच्या पिढीला प्रेरणादायी ठरावी, यासाठी राज्य शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात स्मारक उभारण्याची घोषणा केली आहे. हे स्मारक आष्टीचा स्वातंत्र लढा पुढच्या पिढीला प्रेरणादायी ठरणार आहे.





  Print






News - Wardha




Related Photos