खावटी कर्ज योजनेची मर्यादा किमान १० हजार रुपये करा : आमदार डॉक्टर देवराव होळी
- आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी विचारलेल्या लक्षवेधीतील चर्चेत घेतला सहभाग
- ५० टक्के सूट तर ५० टक्के कर्ज याप्रमाणे करावी खावटी कर्जाची रचना
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / मुंबई : जून ते सप्टेंबर या महिन्यांमध्ये पावसाळा राहत असल्याने अनेक आदिवासी बांधवांना उपासमारीची पाळी येऊ नये म्हणून आदिवासी समाजाकरिता सन १९७८ पासून खावटी कर्ज वाटप योजना सुरू करण्यात आली. मात्र या योजनेचा आदिवासी बांधवांना योग्य त्या प्रमाणात प्रत्यक्ष लाभ होत नसल्याचे निदर्शनास येत आहे.
त्यामुळे योजनेपासून वंचित राहणाऱ्या हजारो आदिवासी बांधवाना लाभ मिळावा याकरिता या योजनेची व्याप्ती वाढवण्याची आवश्यकता असून किमान १० हजार रुपये खावटी कर्ज वाटप करण्यात यावे. त्यात ५० टक्के सूट व ५० टक्के कर्ज या आधारावर त्याची रचना करण्यात यावी अशी मागणी आमदार डॉक्टर देवराव होळी यांनी आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी विधानसभेत मांडलेल्या लक्षवेधीच्या चर्चेच्या प्रसंगी आदिवासी मंत्री डॉ विजयकुमार गावित यांचेकडे केली.
यावेळी आमदार महोदयांनी आदिवासी समाजाच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांचे बारीक सारीक विश्लेषण (एनालिसिस) होण्याची आवश्यकता असून त्यातून आदिवासींमध्ये किती सुधारणा झाली (इम्प्रूमेंट) ते सुद्धा तपासण्याची आवश्यकता असल्याची मागणी त्यांनी या चर्चेच्या माध्यमातून केली. याप्रसंगी आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार जी गावित यांनी सकारात्मक उत्तर देत या संदर्भात योग्य तो निर्णय घेतला जाईल असे आश्वासन आमदार महोदयांना दिले.
News - Rajy