महाराष्ट्रातील आकाशवाणी केंद्राचे स्थानिक मराठी भाषेतील प्रसारण पूर्ववत करण्यात यावे : खासदार रामदास तडस
- लोकसभेत नियम ३७७ अंतर्गत उपस्थित केला मुद्दा
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : महाराष्ट्रातील ११ ते १२ तास असणारे मराठी भाषेतील स्थानिक प्रसारण अवघ्या ५ तासांवर आणण्यात आलेले आहे. स्थानिक कलावंत, विचारवंत ,साहित्यिक, तज्ञ मंडळींना आपल्याच भाषेत अभिव्यक्त होण्याची संधी जवळपास बंद करण्यात आली आहे. त्यामुळे ऑल इंडीया रेडिओ कॅज्युअल अनाउन्सर ॲन्ड कॉर्पोरेशन युनियन व्दारा खासदार रामदास तडस यांनी याबाबत लोकसभेत प्रश्न उपस्थित करण्याबाबत विनंती केले होते, त्या अनुषंगाने खासदार रामदास तडस यांनी लोकसभेत महाराष्ट्रातील आकाशवाणी केंद्रांचे स्थानिक मराठी भाषेतील तिन्ही प्रसारण सभा पूर्ववत करण्यासंदर्भात लोकसभेत नियम ३७७ अंतर्गत प्रश्न उपस्थित करुन लोकसभेचे लक्ष वेधले.
महाराष्ट्रातील २३ आकाशवाणी केंद्राच्या वतीने सकाळी ५ वाजुन ५५ मिनिटांपासून ते रात्री ११ वाजून २० मिनिटांपर्यंत मराठी भाषेमध्ये स्थानिक प्रसारण तीन प्रसारण सभांच्या माध्यमातून सुरू होते. १ जुलै २०२२ पासून मराठी भाषेतील स्थानिक प्रसारण अवघ्या ५ तासांवर आणण्यात आलेले आहे. महाराष्ट्रा जवळील कर्नाटक व गुजरात तसेच देशातील इतर राज्यामधील प्रसारणामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. यामुळे महाराष्ट्र, गोवा आणि मध्यप्रदेश या राज्यामधील बहुसंख्य मराठी भाषिकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे, याकरिता सकाळी ५ वाजुन ५५ मिनिटांपासून ते रात्री ११ वाजून २० मिनिटांपर्यंत मराठी भाषेमध्ये स्थानिक तिन्ही प्रसारण सभा पूर्ववत करण्याबाबत माहिती व प्रसारण मंत्री यांना लोकसभेत नियम ३७७ अंतर्गत विनंती केले.
आकाशवाणीचा लाभ मुख्यत्वे, ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकरी, महिला, गुरराखी मंडळी, टीव्ही कधीही न बघू शकणारे अंधजन यांना होतो, प्रसारणात कपात केल्यामुळे या सर्व समाज घटकांवर मोठी आपत्ती कोसळली आहे. महाराष्ट्रात अनेक लोककला जोपासल्या जातात, त्यातील संगीत भजने, गोंधळी गीत, आराधी गीते, धनगरी ओव्या, भक्तीगीत, लोककला सादर करणाऱ्या हजारो लोककलावंतांना सद्य परिस्थितीत आपली कला सादर करण्याची संधी जवळपास बंद करण्यात आली आहे. महाराष्ट्रात एकूण २३ आकाशवी केंद्र आहेत, याचा मुख्य उद्देश तिथल्या स्थानिक कलावंतांना संधी देणे, त्याचबरोबर तिथल्या लोकांच्या स्थानिक भाषेमध्ये माहिती, शिक्षण आणि मनोरंजन देणे. हा होता पण प्रसार भारतीच्या या निर्णयामुळे स्थानिक रेडिओ केंद्रांच्या निर्मिती मागचा उद्देशच संपविण्यात आला आहे. प्रसार भारती ने स्थानिक भाषेतील प्रसारणात केलेली कपात ही केवळ महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि गोवा राज्यापुरते मर्यादित आहे. यामध्येही सर्वाधिक केंद्र मराठी भाषिक आहेत. हे सर्व लक्षात घेता स्थानिक भाषेतील कार्यक्रमात केलेली मोठी कपात प्रसार भारतीने त्वरित रद्द करावी आणि स्थानिक भाषेतील प्रसारण पूर्ववत म्हणजेच तिन्ही प्रसारण सभेमध्ये सुरू करावे, असे यावेळी खासदार रामदास तडस म्हणाले.
News - Wardha