महत्वाच्या बातम्या

 रिपब्लिकन पक्ष फक्त राजकीय पक्ष नाही ते जन आंदोलन आहे : राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब खोब्रागडे


- गडचिरोली येथे रिपब्लिकन जन चेतना अभियान संपन्न

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : रिपब्लिकन पक्ष हा केवळ राजकीय पक्ष नाही. हे समाजातील गरीब आणि वंचित वर्गासाठी काम करणारे जनआंदोलन आहे. ही चळवळ अधिक बळकट होण्याची आवश्यकता असून ती काळाची गरज आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रवीण उर्फ बाळासाहेब खोब्रागडे यांनी केले.

ते बुधवारी येथील प्रेस क्लब येथे पक्षाच्या रिपब्लिकन जनचेतना अभियानानिमित्त आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला संबोधित करत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष कुलपती मेश्राम हे होते तर केंद्रीय उपाध्यक्ष अशोक निमगडे, रोहिदास राऊत, केंद्रीय सदस्य राजूभाऊ खोब्रागडे, प्रदेश उपाध्यक्ष प्रि. प्रकाश दुधे, प्रदेश सचिव केशराव सम्रुतवार, महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा सुरेखा बारसागडे, यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रारंभी रिपब्लिकन जनचेतना अभियानाचा एक भाग म्हणून फटाके फोडून आणि घोषणाबाजी करत इंदिरा चौक ते प्रेस क्लबपर्यंत मिरवणूक काढण्यात आली.

खोब्रागडे पुढे म्हणाले की, रिपब्लिकन पक्षाने मागासलेल्या व उपेक्षित लोकांसाठी संघर्ष केला आहे. निवडणुकीच्या राजकारणातही अनेक दिग्गज नेत्यांनी चळवळीसाठी बलिदान दिल्याचा गौरवशाली इतिहास आहे. पक्षाचे कार्यक्रम सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी एकत्रित प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.

निमगडे म्हणाले की, सध्याच्या राजकीय व सामाजिक परिस्थितीत रिपब्लिकन पक्षाचे अस्तित्व टिकून राहणे गरजेचे आहे कारण राजकीय सत्तेसोबतच सामाजिक परिवर्तनासाठी या पक्षाची स्थापना करण्यात आली आहे. हा एकमेव पक्ष आहे जो वंचित वर्गाचा खरा आवाज बनू शकतो. सर्वसामान्य जनतेला अनेक समस्यांचा सामना करावा लागत असून रिपब्लिकन पक्ष या समस्या सरकारसमोर मांडत राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.

अध्यक्षीय भाषणात कुलपती मेश्राम यांनी रिपब्लिकन पक्षाचा उल्लेख लोकांचा पक्ष असा केला आणि पक्षाचे गतवैभव परत मिळवण्यासाठी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेण्याचे आवाहन केले. या पक्षाकडे अजूनही  मुख्य प्रवाहाचा राजकीय पक्ष बनण्याची क्षमता आणि सामर्थ्य आहे, असे ते म्हणाले.

यावेळी गडचिरोली विधानसभा प्रमुख प्रदीप भैसारे, शहराध्यक्ष अनिल बारसागडे, जिल्हा महिला आघाडी प्रमुख नीता सहारे, सरचिटणीस ज्योती उंदिरवाडे, वनमाला झाडे आदी उपस्थित होते.

हंसराज उंदिरवाडे यांनी प्रास्ताविक केले.  कार्यक्रमाचे संचालन प्राचार्य राजन बोरकर यांनी तर आभार तैलेश बांबोडे यांनी मानले. रॅली यशस्वीतेसाठी कृष्णा चौधरी, अशोक खोब्रागडे, नरेंद्र रायपुरे, हेमचंद्र सहारे, प्रल्हाद रायपुरे, साईनाथ गोडबोले, विजय देवतळे आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos