महत्वाच्या बातम्या

 मतदान संपताच मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार भडकला : सीआरपीएफ चे दोन जवान शहीद


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / मणिपूर : मणिपूरमधील दोन जागांवर लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होताच पुन्हा हिंसाचार भडकला आहे. शुक्रवारी मध्यरात्री कुकी उग्रवाद्यांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) पथकावर घात लावून हल्ला केला. या हल्ल्यामध्ये दोन जवान शहीद झाले असून अनेक जखमी झाले आहेत. 

मणिपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुकी उग्रवाद्यांनी शुक्रवारी मध्यरात्री २ वाजून १५ मिनिटांनी सीआरपीएफच्या पथकावर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये दोन जवान शहीद झाले. हे दोन्ही जवान मणिपूरच्या विष्णूपूर जिल्ह्यातील नारनसेना भागामध्ये तैनात असणाऱ्या सीआरपीएफच्या १२८ व्या बटालियनचे सदस्य होते.

तत्पूर्वी उग्रवाद्यांनी कांगपोकपी, उखरूल आणि इम्फाळ पूर्व भागामध्ये गोळीबार केला. या गोळीबारामध्ये कुकी समाजाच्या दोघांचा मृत्यू झाला. यानंतर थौबल जिल्ह्यातील हेइरोक आणि तैंगनौपाल येथेही गोळीबाराची घटना घडली आणि त्यानंतर हिंसाचार भडकला.

सर्वाधिक मतदान -

शुक्रवारी लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्याचे मतदान पार पडले. एकूण ८८ जागांवर झालेल्या या निवडणुकीत मणिपूरच्या एका जागेचाही समावेश होता. आउटर मणिपूर जागेसाठी एकूण ७७.३० टक्के मतदान झाले. विशेष म्हणजे उग्रवाद्यांनी धमकावल्यानंतरही लोकं मोठ्या प्रमाणात मतदानासाठी बाहेर पडले आणि सर्वत्र शांततेत मतदान पार पडले असे मणिपूरचे मुख्य निवडणूक अधिकारी प्रदीप कुमार झा यांनी सांगितले. मात्र त्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार भडकला.

१९ एप्रिलला इनर मणिपूरमध्ये मतदान -

मणिपूरमध्ये इनर मणिपूर आणि आऊटर मणिपूर अशा लोकसभेच्या दोन जागा आहेत. आऊटर मणिपूरमध्ये २६ एप्रिलला मतदान पार पडले, तर इनर मणिपूरमध्ये १९ एप्रिलला मतदान झाले. इनर मणिपूरमध्ये जवळपास ७८.७८ टक्के मतदान झाले. यादरम्यान हिंसाचाराच्या अनेक घटना समोर आल्या. त्यामुळे २२ एप्रिल रोजी ११ मतदान केंद्रावर पुर्नमतदान झाले होते.





  Print






News - World




Related Photos