विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन कुलगुरू करणार : नवीन अभ्यासक्रमांविषयी विद्यार्थ्यांशी थेट संवाद
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / मुंबई : मुंबईविद्यापीठातील विविध शैक्षणिक विभाग आणि संलग्नित महाविद्यालयांत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना कुलगुरू संवाद या उपक्रमाअंतर्गत थेट कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांच्याशी संवाद साधता येणार आहे.
यावेळी ते नवीन अभ्यासक्रमांविषयी विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करणार आहेत.
येत्या शैक्षणिक वर्षापासून विद्यापीठातील सर्व बिगर संलग्नित महाविद्यालयांत तीन आणि चार वर्षांचे अभ्यासक्रम राबविले जाणार आहेत. यात विविध मेजर, मायनर, ओपन इलेक्टिव्ह, व्होकेशनल स्कील कोर्सेस, एबिलिटी एनहान्समेंट कोर्सेससह सहा व्हर्टिकलविषयी असलेल्या शंकांचे निरसनही केले जाईल.
१) विद्यापीठातील पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाला शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक व अनुषंगिक बाबींशी निगडित प्रश्न, शंका, समस्या यांचे निरसन यात करता येईल.
२) यात पात्रता व नावनोंदणी, गुणपत्रिका, पदवी प्रमाणपत्र यासह परीक्षा विभागाशी निगडित बाबींचे निरसन करण्यात येईल.
३) यावेळी विद्यापीठाचे इतर पदाधिकारी म्हणजे प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे, कुलसचिव प्रा. बळीराम गायकवाड, परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालिका डॉ. पूजा रौंदळे आणि संबंधित अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
४) याशिवाय विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी विद्यापीठात तक्रार निवारण समिती कार्यरत असून, विद्यार्थी विकास विभागामार्फत याचे कामकाज पाहिले जाते. विद्यार्थ्यांचे व्यापक शैक्षणिक हित लक्षात घेता विद्यापीठामार्फत लोकपाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना याही सुविधांचा लाभ घेता येईल.
५) पहिला विद्यार्थी संवाद या कार्यक्रम ३ एप्रिल आणि १८ एप्रिलला सकाळी ११ ते १२:३० वाजण्याच्या दरम्यान विद्यापीठाच्या विद्यानगरी संकुलातील छत्रपती शिवाजी महाराज भवन (नवीन परीक्षा भवन) येथे होणार आहे.
पहिला संवाद ३ एप्रिलला : ओळखपत्र आणणे अनिवार्य-
१) यापुढेही महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या बुधवारी विद्यापीठात या कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल.
२) या उपक्रमात सहभागी होणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी त्यांचे ओळखपत्र सोबत आणणे अनिवार्य असणार आहे.
News - Rajy