तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत शहरातील पान टपऱ्यांवर धडक कारवाई

- ५ हजार ४०० रुपये दंड वसूल
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : तंबाखू नियंत्रण कायदा २००३ च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत सामान्य रुग्णालय, अन्न व औषधी प्रशासन विभाग तसेच पोलीस विभागाच्या सहकार्याने वर्धा शहरातील प्रमुख मार्गावरील वीस पान टपऱ्यांवर धडक कारवाई करुन ५ हजार ४०० रुपये दंड वसूल करण्यात आला.
तंबाखू नियंत्रण कायदा २००३ नुसार तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन व विक्री करण्यास बंदी आहे. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनामुळे मानवी शरीरावर होणारे दुष्परिणाम होत असून उच्च रक्तदाब, मधुमेह, पक्षघात, हृदयविकार, कॅन्सर यासारखे आजार होत आहे. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थामध्ये विविध रासायनिक घटकांचा समावेश असतो. त्यामुळे या व्यसनापासून दुर राहणे गरजेचे आहे.
जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या आदेशानुसार जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सचिन तडस यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा सल्लागार डॉ. नम्रता सलुजा, समुपदेशक राहुल बुचुंडे, सामाजिक कार्यकर्ता हर्षद ढोबळे, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त (अन्न) प्रफुल टोपले, अन्न सुरक्षा अधिकारी गेडाम, अमित तृपकाने, पोलीस विभागाचे गायकवाड, पंकज भरणे, विजय गिरमकर यांनी ही कारवाई केली.
News - Wardha




Petrol Price




