महत्वाच्या बातम्या

 विकसित भारत संकल्प यात्रे दरम्यान केंद्रीय सहसचिवाची ग्रामस्थांशी संवाद


- चेकलिखीतवाडा (ता. गोंडपिपरी) येथे यात्रेचा शुभारंभ

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : समाजातील तळागाळातील वंचित घटकांना केंद्र व राज्य सरकारच्या कल्याणकारी योजनांची माहिती मिळावी, या उद्देशाने विकसित भारत संकल्प यात्रा सुरू करण्यात आली आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचे सहसचिव तथा जिल्हा नोडल अधिकारी आनंद पाटील यांच्या हस्ते गोंडपिपरी तालुक्यातील चेकलिखीतवाडा ग्रामपंचायत येथे संकल्प यात्रेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. 

कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्याम वाखर्डे, शिक्षणाधिकारी (प्राथ.) राजकुमार हिवारे, गोंडपिपरी पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी गजानन मुंडकर, नायब तहसीलदार राजेश मडापे, चेकलिखितवाड्या सरंपच पुष्पा राऊत, उपसरपंच हरिश्चंद्र मडावी आदी उपस्थित होते.

यावेळी सहसचिव पाटील म्हणाले, केंद्र सरकार राबवित असलेल्या कल्याणकारी योजनांची जनतेला माहिती असणे आवश्यक आहे, यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लोकांपर्यंत पोहचावे. आपले जीवनमान उंचावण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी या योजनांचा लाभ घेण्यासाठी सदैव प्रयत्नरत असावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी त्यांनी कार्यक्रमस्थळी लावण्यात आलेल्या विविध विभागाच्या दर्शनी स्टॉलला भेट देऊन ग्रामस्थ आणि शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तसेच शेतकऱ्यांसाठी ड्रोन फवारणी यंत्राद्वारे अल्प वेळात फवारणी कशी शक्य आहे, याचे प्रात्याक्षिक बघितले.

शिक्षणाधिकारी हिवारे यांनी शिक्षण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विद्यार्थीहिताच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती दिली. श्याम वाखर्डे यांनी आयुष्यमान भारत, पी.एम.विमा, पी.एम. विश्वकर्मा योजना व अन्य योजनांची माहिती दिली. तत्पुर्वी मान्यवरांच्या हस्ते कर्मयोगी गाडगे महाराज व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले.

कार्यक्रमाचे संचालन गणेश आसेकर व आभार अमित पिरके यांनी मानले. यावेळी सर्व गावकरी, तालुक्यातील विविध कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा : जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेतांना सहसचिव आनंद पाटील म्हणाले, विकसीत भारत संकल्प यात्रेत सर्व विभागांनी उत्स्फुर्तपणे सहभागी होवून शासनाच्या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहचवाव्यात. प्रत्येक विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी फिल्डवर जावून या यात्रेत सहभाग नोंदवावा. कृषी विभागाने शेतकऱ्यांचे ई-केवायसी व आधार सिडींग करून घ्यावे. तर बँकांनी विविध योजनांचा लाभ गावकऱ्यांना मिळवून देण्यासाठी जिल्हा अग्रणी बँकने गांभिर्यपूर्वक लक्ष द्यावे, अशा सुचना त्यांनी दिल्या. विशेष म्हणजे अतिशय कमी वेळात केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंह पुरी यांचा कार्यक्रम चंद्रपूर येथे आयोजित केल्यामुळे त्यांनी जिल्हा प्रशासनाचे कौतुक देखील केले.

बैठकीला जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, सहायक जिल्हाधिकारी मुरुगानंथम एम., अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, मनपा आयुक्त विपीन पालीवाल, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मिना साळूंके, श्याम वाखर्डे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे व इतर विभाग प्रमुख उपस्थित होते.





  Print






News - Chandrapur




Related Photos