महत्वाच्या बातम्या

 योजनांचा लाभ लक्ष्यित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवूनविकसीत भारत संकल्प यात्रेचा उद्देश सफल करा : राज्यपाल रमेश बैस


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : समाजातील सर्वसामान्य घटकांच्या कल्याणासाठी केंद्र शासनाने विविध योजना सुरु केल्या आहेत. त्या  योजनांना लक्ष्यित लाभार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून विकसित भारत संकल्प यात्रा हा महत्वाकांक्षी उपक्रम राबविण्यात येत आहे. योजनांचा लाभ लक्ष्यित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवून विकसीत भारत संकल्प यात्रेचा उद्देश सफल करा,असे आवाहन आज राज्यपाल रमेश बैस यांनी भंडारा जिल्हयातील डिफेन्स ॲकेडमी, शहापूर येथे आयोजित कार्यक्रमात केले.

यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित, खासदार, भंडारा-गोंदिया सुनील मेंढे, आमदार नरेंद्र भोंडेकर, माजी राज्यमंत्री परिणय फुके, पोलीस महानिरीक्षक, नागपूर, छेरिंग दोरजे, जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, मुख्य कार्यकारी अधिकारी समीर कुर्तकोटी, पोलीस अधिक्षक लोहीत मतानी उपस्थित होते.

यावेळी विकसीत भारत संकल्प यात्रेच्या प्रचार व्हॅनला राज्यपाल व पालकमंत्री यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला.

बैस म्हणाले की, आजपर्यंत विविध सरकारने अनेक विकास योजना राबविल्या आहेत. परंतु, योजनांचा लाभ लक्ष्यित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचतो की नाही, याची खातरजमा करण्याची ही पहिलीच वेळ आहे. विकसीत भारत योजनेतुन अदयापही विकासाच्या प्रक्रीयेपासुन दूर असणाऱ्या तळागाळातील घटकांपर्यत १७ योजनांचा प्रचार-प्रसार करण्यात येणार आहे.

यात्रेच्या माध्यमातून आयुष्मान भारत प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना, दीनदयाल अंत्योदय योजना-राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना पंतप्रधान विश्वकर्मा पंतप्रधान किसान सन्मान किसान क्रेडिट कार्ड प्रधानमंत्री पोषण अभियान हर घर जल-जल जीवन मिशन जन धन योजना अटल पेन्शन योजना नॅनो फर्टिलायझर्स इत्यादी योजनांची माहिती शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवावी लागेल. यासाठी लोकसहभाग ही महत्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले.

आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी जिल्हयातील विकासकार्याची माहिती यावेळी दिली. तर महिला बचतगटाकडून उत्पादीत वस्तुसाठी भंडारा येथे व्यापारसंकुल उभारण्याची अपेक्षा व्यक्त केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात विकसीत भारत संकल्प यात्रेतुन देश विकासमार्गावर अग्रेसर असल्याचे खासदार सुनील मेंढे यांनी सांगितले. जिल्हयातील केंद्र शासनाच्या योजनांची प्रगती त्यांनी यावेळी  मांडली. अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतनुकसानीबाबत शेतकऱ्यांना तातडीची मदत करण्याची मागणी त्यांनी केली.

पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावीत यांनी विकसीत भारत यात्रेचा मुळ उददेश प्रसारासोबत पात्र लाभार्थ्यांना योजनांचे वेळेत लाभ देणे हा असल्याचे  सांगितले. जिल्हयातील १११ गावात ही यात्रा पोहोचली असुन ७ हजारावर नागरिकांनी यात सहभाग घेतला आहे.

यावेळी जिल्हयातील २२ लाभार्थ्याना राज्यपालांच्या हस्ते लाभ वाटप करण्यात आले. तुमसर येथील पवन कटनकर व लाखनी उमेद महिला बचतगटाच्या उषा कावळे या लाभार्थ्यानी मनोगत व्यक्त केले. तत्पुर्वी राज्यपालांना पोलीस दलाच्या पथकाने मानवंदना दिली. तसेच विविध शासकीय विभागांच्या स्टॉलना त्यांनी भेट दिली. उपस्थित शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधुन त्यांच्या अडचणी जाणुन घेतल्या.

कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली. तर मुख्य कार्यकारी अधिकारी समीर कुर्तकोटी यांनी आभार व्यक्त केले.

कार्यक्रमानंतर राज्यपाल महोदयांनी कोरंबी येथील पिंगळेश्वरी मातेच्या मंदिरात भेट देवून दर्शन घेतले.





  Print






News - Bhandara




Related Photos