महत्वाच्या बातम्या

 बल्लारपूरच्या क्रीडा संकुलात होणार राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धा


- मिशन ऑलिम्पिकचे ध्येय ठेवून उत्कृष्ट नियोजन करण्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे निर्देश

- चंद्रपुरातील स्पर्धा उत्तम आणि दर्जेदार होईल : क्रीडा मंत्री संजय बनसोडे

- २७ ते ३१ डिसेंबर या कालावधीत विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन, ना. मुनगंटीवार यांनी घेतली आढावा बैठक

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : विसापूर (ता. बल्लारपूर) येथील तालुका क्रीडा संकुलात २७ ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीत राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा खऱ्या अर्थाने जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब ठरणार आहे आणि या निमित्ताने चंद्रपूरकरांना राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धांचा आनंदही घेता येणार आहे. २०३६ मध्ये भारतात ऑलिम्पिक स्पर्धा घेण्याचा संकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. त्यामुळे मिशन ऑलिम्पिकच्या निमित्याने उत्कृष्ट खेळाडू घडविण्याचे उद्दिष्ट ठेवूनच बल्लारपूर येथे होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे नियोजन करावे, असे निर्देश राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहेत. त्याचवेळी या स्पर्धा अतिशय दर्जेदार आणि उत्तम होतील, असा विश्वास क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी व्यक्त केला आहे.

जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत नियोजन सभागृह येथे क्रीडा स्पर्धेच्या आयोजनाचा आढावा घेण्यात आला. यावेळी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव रणजित देओल, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभिषन चवरे, जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्य वनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर, वन अकादमीचे संचालक श्रीनिवास रेड्डी, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, क्रीडा उपसंचालक शेखर पाटील, मनपा आयुक्त विपिन पालीवाल, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड, हरीश शर्मा, देवराव भोंगळे, राहुल पावडे यांच्यासह विविध क्रीडा संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

ऑलिम्पिकची तयारी करण्यासाठी सरासरी १० वर्षे लागतात, असे सांगून पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, बल्लारपूर येथे होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातूनच मिशन ऑलिम्पिकची सुरुवात झाली पाहिजे. देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधून जवळपास 3 हजार खेळाडू, त्यांचे मार्गदर्शक, पंच, पालक, क्रीडा प्रशिक्षक आदी लोक सहभागी होणार आहेत. त्यामुळे त्यांच्या भोजनाची आणि निवासाची उत्तम व्यवस्था व्हायला पाहिजे. या दोन्ही व्यवस्था उत्तम असतील तरच पाहुण्यांचे मन जिंकण्यात यश मिळत असते. त्यामुळे उत्तम आयोजन व नियोजनासाठी अधिकाऱ्यांच्या टीमने सज्ज राहावे आणि कामांचे उत्तम नियोजन करावे, असेही मुनगंटीवार म्हणाले. यावेळी जेवणाचा दर्जा व भोजनाच्या ठिकाणची स्वच्छता या दोन्हीकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.

प्रत्येकाची जबाबदारी -

जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रातील एनजीओ, क्रीडा संस्था व विविध खेळांशी संबंधित लोकांच्या टीम निश्चित करून त्यांची यादी तयार करावी. खेळाडूंना क्रीडांगणावर ने-आण करण्यासाठी परिवहन महामंडळाच्या बसेससोबतच शाळांच्या बसेस राखीव ठेवाव्यात. तसेच ऑनकॉल वाहने उपलब्ध ठेवावीत. स्टेडियमच्या रंगरंगोटीवर लक्ष केंद्रित करावे. शालेय विद्यार्थ्यांना क्रीडा स्पर्धेचा आस्वाद घेण्यासाठी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी. या स्पर्धा केवळ क्रीडा विभागाच्या नाही तर आपण सगळे आयोजक आहोत, या भावनेतून प्रत्येक चंद्रपूरकराने स्पर्धा यशस्वी होण्यासाठी आपले योगदान द्यावे, असे आवाहन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. 

राष्ट्रीय स्पर्धा दर्जेदारच होतील - क्रीडा मंत्री संजय बनसोडे

चंद्रपूर जिल्ह्यात होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे उत्कृष्ट नियोजन जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात होत आहे. त्यामुळे येथील स्पर्धा दर्जेदार होणार, यात तिळमात्र शंका नाही, असा विश्वास राज्याचे क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी व्यक्त केला. राज्याच्या क्रीडा विभागाकडून या स्पर्धेसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. मिशन ऑलिम्पिक २०३६ ची घोषणा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. त्याची सुरुवात राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने चंद्रपुरातून होईल, असेही ते म्हणाले.

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्ह्यात खेळाच्या अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. ते म्हणाले, तीन वर्षांपासून रखडलेले शिवछत्रपती पुरस्कार व जीवन गौरव पुरस्कारांचे वाटप नुकतेच करण्यात आले आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने चांगली कामगिरी केली असून सुवर्ण पदक प्राप्त खेळाडूंना १ कोटी रुपये, रौप्य पदक प्राप्त खेळाडूंना ७५ लक्ष रुपये तर कांस्य पदक प्राप्त खेळाडूंना ५० लक्ष रुपये देण्याचा निर्णय क्रीडा विभागाने घेतला आहे. तसेच पुणे येथे आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ तर संभाजीनगर येथे राष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ प्रस्तावित आहे. पुणे येथे ऑलिम्पिक भवनाकरीता पहिल्या टप्प्यात ७५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. मेजर ध्यानचंद यांच्या नावाने २९ ऑगस्ट हा क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. तर पहिले ऑलिम्पिक पदक विजेते स्व. खाशाबा जाधव यांच्या नावाने आता १५ जानेवारी रोजी महाराष्ट्र क्रीडा दिन साजरा करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.





  Print






News - Chandrapur




Related Photos