चंद्रपूर जिल्ह्यात राष्ट्रीय लोक अदालतीत ११३९ प्रकरणे यशस्वीपणे निकाली


- मोटार अपघाताच्या ८४ प्रकरणांत १०.३८ कोटींची नुकसानभरपाई मंजूर
- दाखलपूर्व प्रकरणांत ८६.३१ लाख रुपयांची वसुली
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष अभय लाहोटी यांच्या मार्गदर्शनाखाली १२ सप्टेंबर २०२६ रोजी चंद्रपूर जिल्हा न्यायालयासह जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले.
या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये एकूण १० हजार ४६ प्रलंबित न्यायालयीन प्रकरणे आणि १० हजार ३४४ दाखलपूर्व प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती. त्यापैकी १ हजार २७ प्रलंबित न्यायालयीन प्रकरणे आणि ११२ दाखलपूर्व प्रकरणे अशी एकूण १ हजार १३९ प्रकरणे यशस्वीपणे निकाली काढण्यात आली.
लोक अदालतीमध्ये मोटार अपघात नुकसानभरपाईची ८४ प्रकरणे निकाली काढण्यात आली. या प्रकरणांमध्ये एकूण १० कोटी ३८ लाख९ हजार ६७० रुपयांची नुकसानभरपाई मंजूर करण्यात आली. तसेच दाखलपूर्व प्रकरणांमध्ये ८६ लाख ३१ हजार २०५ रुपयांची वसुली करण्यात आली. धनादेश अनादराच्या प्रकरणांपैकीही ३४ प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यात आली.
राष्ट्रीय लोक अदालत ही पक्षकारांना परस्पर सामंजस्याने व तडजोडीच्या माध्यमातून वाद निकाली काढण्यासाठी प्रभावी व्यासपीठ ठरत आहे. यामुळे पक्षकारांचा वेळ आणि खर्च वाचण्यासोबतच प्रलंबित प्रकरणांचा जलद निपटारा होण्यास मदत होते.
चंद्रपूर जिल्ह्यातील राष्ट्रीय लोक अदालत यशस्वी करण्यासाठी सर्व न्यायाधीश, वकील, न्यायालयीन कर्मचारी तसेच पोलीस कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, चंद्रपूरचे सचिव एस. एस. इंगळे यांनी दिली.




Petrol Price




