महत्वाच्या बातम्या

 एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या पहिल्या पदवीधर बॅचला भावपूर्ण निरोप


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : एसएनडीटी महिला विद्यापीठ, मुंबईच्या बल्लारपूर आवारातील २०२३–२०२६ या कालावधीतील पहिल्या पदवीधर बॅचचा निरोप समारंभ २१ ऑगस्ट रोजी उत्साहपूर्ण व भावनिक वातावरणात पार पडला. विद्यापीठाच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमामुळे बल्लारपूर आवाराच्या शैक्षणिक वाटचालीतील एक महत्त्वाचा टप्पा अधोरेखित झाला.

कार्यक्रमाला बल्लारपूर आवाराचे संचालक डॉ. राजेश इंगोले, उपकुलसचिव डॉ. बाळू राठोड आणि समन्वयक डॉ. वेदानंद अलमस्त यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांनी पदवीधर विद्यार्थिनींना पुढील शैक्षणिक, व्यावसायिक व सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

मार्गदर्शन करताना डॉ. राजेश इंगोले यांनी बल्लारपूर आवाराच्या पहिल्या पदवीधर बॅचचे कौतुक केले. आवाराच्या उभारणीच्या सुरुवातीच्या टप्प्यात शिक्षण घेतलेल्या विद्यार्थिनी आता पदवीधर होऊन विविध क्षेत्रांत स्वतंत्र ओळख निर्माण करण्यासाठी पुढे जात असल्याबद्दल त्यांनी अभिमान व्यक्त केला. विद्यार्थिनींनी ज्ञान, कौशल्य आणि संस्कारांचा उपयोग समाजाच्या विकासासाठी करावा, असे आवाहन त्यांनी केले.

डॉ. बाळू राठोड यांनी पहिल्या बॅचसोबत जोडलेल्या आठवणींना उजाळा देत या विद्यार्थिनींचे विद्यापीठाच्या इतिहासात कायमस्वरूपी स्थान राहणार असल्याचे सांगितले. आत्मविश्वास, नेतृत्वगुण, सामाजिक बांधिलकी आणि सकारात्मक दृष्टिकोन ही मूल्ये आयुष्यभर जपण्याचे आवाहन त्यांनी केले. डॉ. वेदानंद अलमस्त यांनीही विद्यार्थिनींना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी विद्यार्थिनींनी आपल्या मनोगतातून तीन वर्षांच्या शैक्षणिक प्रवासातील आठवणींना उजाळा दिला. नवीन कॅम्पसमध्ये प्रवेश घेतानाची उत्सुकता, मैत्रिणी, शिक्षकांचे मार्गदर्शन, शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रम, क्रीडा स्पर्धा आणि कॅम्पसमधील आनंदाचे क्षण यांचा उल्लेख करताना अनेक विद्यार्थिनी भावूक झाल्या. बल्लारपूर आवाराने केवळ पदवीचे शिक्षण न देता आत्मविश्वासाने स्वप्ने पाहण्याची व ती पूर्ण करण्याची प्रेरणा दिल्याचे विद्यार्थिनींनी सांगितले.

समारंभात गुणवंत विद्यार्थिनींचा गौरव करण्यात आला. अकॅडमिक एक्सलन्स अवॉर्ड (२०२३–२०२६) रिया जयकिशन तिलोकानी हिला प्रदान करण्यात आला. तसेच २०२३– २०२६ बॅचची सर्वोत्कृष्ट विद्यार्थिनी म्हणून गुंजा सुकरू निषाद हिचा विशेष सन्मान करण्यात आला. क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल श्रुती कांबळे, रिया तिलोकानी, पूनम शर्मा आणि काशिश अलोने यांचाही गौरव करण्यात आला.

कार्यक्रमादरम्यान विद्यार्थिनींनी विविध सांस्कृतिक सादरीकरणे करून सहाध्यायी व शिक्षकांना भावनिक निरोप दिला. क्रीडा व मनोरंजक उपक्रमांमुळे कार्यक्रमात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंकिता यादव, फरहाद शेख आणि अनुष्का ठाकूर यांनी केले. क्रीडा उपक्रमांचे संचालन झैनब शेख व जोया खान यांनी केले. श्रुती टेंभुर्णे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सांस्कृतिक विभागाच्या सहाय्यक प्राध्यापिका अश्विनी वाणी, अपेक्षा पिंपळे, शीतल बिल्लोरे तसेच प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

बल्लारपूर आवारातील पहिली पदवीधर बॅच आता पदवी घेऊन नव्या वाटचालीला सुरुवात करीत आहे. त्यामुळे हा निरोप समारंभ केवळ एका बॅचला दिलेला निरोप न ठरता बल्लारपूर आवाराच्या शैक्षणिक प्रवासातील पहिल्या यशस्वी अध्यायाचा भावपूर्ण उत्सव ठरला.





  Print






Related Photos