महत्वाच्या बातम्या

 भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता भारतमातेचा सुपुत्र : बामणी येथे शेकडों लोकांचा भाजपात प्रवेश 


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / बल्लारपूर : इतर पक्षांमध्ये नेत्यांचा परिवार हाच पक्ष मानला जातो आणि त्या पक्षाचा नेताच पक्षाचा ब्रँड अॅम्बेसेडर असतो. मात्र भारतीय जनता पार्टीसाठी कार्यकर्ता हाच खरा ब्रँड अॅम्बेसेडर आहे. आणि प्रत्येक कार्यकर्ता हा भारतमातेचा सुपूत्र आहे, असे प्रतिपादन चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार बामणी येथे केले.


बामणी येथे पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम शुक्रवारी आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते चंदनसिंह चंदेल, भाजपचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, बल्लारपूरचे तालुकाध्यक्ष किशोर पंदीलवार, माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. हरीश गेडाम, माजी पंचायत समिती उपसभापती गोविंदा पोडे, लावारीचे सरपंच पोतराजे, ग्रामपंचायत सदस्य गणपत मोरे, नीलेश खरबडे यांची प्रमुख उपस्थिती होती. मुनगंटीवार म्हणाले, ज्या कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला त्यांचा एखाद्या पक्षात नव्हे तर, भारतीय जनता पार्टी नावाच्या परिवारात प्रवेश झालेला आहे. भाजपमध्ये कोणत्याही जातीभेदाला थारा नाही. कार्यकर्त्यांच्या जोरावर चालणारा हा पक्ष आहे. भारतीय जनता पार्टीचा झेंडा हा राष्ट्रभक्तीचा झेंडा आहे. हा झेंडा हाती घेणाऱ्याला आयुष्यात आनंद आणि समाधान दोन्ही प्राप्त होते.

भाजपाला कधी काळी हिणवले जायचे. परंतु विश्वगौरव, देशगौरव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्षाची ओळखच बदलून टाकली आहे, असे मुनगंटीवार यांनी अभिमानाने नमूद केले. ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर यांनीही मोदीजीकडे पाहुन त्यांच्यात जगाचे नेतृत्व करण्याची क्षमता असल्याचे म्हटले होते, याचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला.

अर्थसंकल्प गरिबांचा, शेतकऱ्यांचा केंद्र आणि राज्याचा अर्थसंकल्प सामान्यांना डोळ्यापुढे ठेवून तयार करण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात आता थेट १२ हजार रुपये जमा होणार आहेत. कोट्यवधी लोकांना सुमारे २८ महिने मोफत धान्य देण्यात आले. गरिबांवर उपाशी झोपण्याची वेळ येऊ नये हाच हेतू आहे, या शब्दांत मुनगंटीवार यांनी अर्थसंकल्पाचे कौतुक केले. राज्य सरकारने एक रुपयात पीकविमा देण्याचा निर्णय केला आहे. आपण अर्थमंत्री असताना संकटग्रस्त शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा केली होती. या अनुदानात आता शेतकऱ्यांच्या कुटुंबांचाही समावेश करण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर त्यांना आता विनाविलंब मदतही मिळणार आहे, असे मुनगंटीवार यांनी नमूद केले.


विरोधकांना चिंतेचे कारण नाही
निराधारांना मिळणारे अनुदान सर्वप्रथम आपण वाढवले. त्यानंतर आता त्यात आणखी वाढ केली आहे. अंगणवाडी सेविका, मदतनिसांच्या मानधनातही भरघोस वाढ करण्यात आली आहे, याचा उल्लेख करत विरोधकांनी चिंता करण्याचे कारण नाही, कारण हे सर्वसामान्यांचे सरकार आहे, असा टोलाही मुनगंटीवार यांनी लगावला. सर्वसामान्यांशी गद्दारी करून महाविकास आघाडी सत्तेवर आली. पण त्यांच्या कार्यकाळात कोणतीही कामे झाली नाही. पण आता चित्र पूर्णपणे पालटले आहे. आता विकासाचा शून्य नको असेल तर सर्वांनी विश्वगौरव, देश गौरव नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करावे, असे आवाहन मुनगंटीवार यांनी केले.


जातीच्या नावाने विषाची पेरणी
काही पक्ष, काही नेते जातीच्या नावावर समाजात वीष पेरण्याचे काम करीत आहेत. सुरुवातीपासूनच त्यांचे तेच धोरण राहिलेले आहे. अशा जातीय विखार पेरणाऱ्यांपासून सावध राहण्याची गरज आहे, असेही मुनगंटीवार म्हणाले.





  Print






News - Chandrapur




Related Photos