महत्वाच्या बातम्या

 समृद्धी महामार्गावरील अपघातांची मालिका थांबणार : परिवहन विभागाकडून खास मोहीम


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : नागपूर आणि मुंबई दरम्यान अंतर कमी करण्यासाठी जलद गती असा समृद्धी महामार्ग बनवण्यात आला आहे. मात्र हा महामार्ग सुरू झाल्यापासून अपघातांचे प्रमाणही वाढले आहे.

त्यामुळे आता वेगवेगळ्या कारणाने झालेले अपघात आणि त्यावर उपाययोजना करण्यासाठी परिवहन विभाग व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ सक्रिय झाला आहे. या महामार्गावर अपघात होऊ नये, यासाठी खास मोहीम राबवण्यात येत आहे.

नागपूर आणि मुंबई दरम्यानचा समृद्धी महामार्ग हा सरळ महामार्ग आहे. पहिल्या टप्प्यातील नागपूर ते शिर्डी हा महामार्ग सुरू करण्यात आला आहे. महामार्ग वाहतुकीस खुला झाल्यापासून गेल्या ४० दिवसात या महामार्गावर जवळपास ६५ अपघात झाले. एकट्या बुलढाणा जिल्ह्यात २३ अपघात झाले आहेत. त्यामुळे हा महामार्ग समृद्धी ऐवजी अपघातांची मालिका घेऊन आला की काय असे चित्र उभे राहिले आणि त्यामुळे प्रशासनही हादरले आहे. आता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि परिवहन विभाग हे अपघात टाळण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना घेऊन रस्त्यावर उतरले आहेत. हे अपघात कशामुळे होतात त्याची कारणे काय यावरही आता चर्चा सुरू झाली आहे.

समृद्धी महामार्गावरील अपघातांची संख्या बघता आणि त्याची कारने बघता आता यावर लवकरात लवकर उपाययोजना करणे, वाहन चालकांची जनजागृती करणे यावर परिवहन विभाग भर देत आहे. गेल्या ४० दिवसात या महामार्गावर अनेक अपघात झाले आहेत. 

परिवहन विभागाच्या उपाययोजना

अनेक कारणांमुळे समृद्धी महामार्गावरील अपघातांची संख्या वाढली आहे. त्यामुळे आता परिवहन विभाग आणि एमएसआरडीसी यांच्या संयुक्त विद्यमाने वाहन चालकांवर जनजागृती करणे, टायर फुठून अपघात होऊ नये म्हणून प्रत्येक पेट्रोल पंपावर टायरमध्ये नायट्रोजन भरण्याची व्यवस्था करणे, अशा अनेक उपाय योजना आता प्रत्यक्ष समृद्धी महामार्गावर उतरून परिवहन विभागाचे अधिकारी करत आहेत. याबरोबरच टायर इंडिकेटर डेमो, रोड हिप्नॉसिस डेमो आणि वेगवेगळ्या इलेमेंटचे डेमो देण्यात येणार आहेत.

महामार्गाच्या आजूबाजूला कुठेही हॉटेल्स किंवा ढाबा नसल्याने आता अनेक ठिकाणी अनधिकृतरित्या छोटे-छोटे फूड स्टॉल आणि टपऱ्या आजूबाजूच्या गावातील लोकांनी लावण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे महामार्गाच्या बाजूला मोठे ट्रक आणि वाहने थांबताना दिसत आहेत. यामुळे सुद्धा अपघात वाढले आहेत. त्यामुळे परिवहन विभागाचे पोलिस आणि एमएसआरडीसीने या अनाधिकृत स्टॉल्सवर कारवाई करणे गरजेचे आहे. अन्यथा अनेक ठिकाणी अशा अनधिकृत फुल स्टॉलमुळे मोठे अपघात होण्याची शक्यता आहे.





  Print






News - Nagpur




Related Photos