आषाढी एकादशीनिमित्त चंद्रपूरचे श्री विठ्ठल मंदिर भक्तिरसात न्हाऊन

- ३५० वर्षांची अखंड परंपरा; विदर्भाचे पंढरपूर भाविकांच्या जयघोषाने दुमदुमणार
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : विदर्भातील वारकरी संप्रदायाचे प्रमुख श्रद्धास्थान आणि विदर्भाचे पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंद्रपूर येथील ऐतिहासिक श्री विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.
सुमारे ३५० वर्षांची ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या या मंदिरात सात दिवसीय धार्मिक उत्सवाला प्रारंभ झाला असून, शनिवारी आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी होणार आहे. गुरुवार ३० रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांनी उत्सवाची सांगता होणार आहे.
चंद्रपूर शहरातील श्री विठ्ठल मंदिर हे वारकरी संप्रदायाचे विदर्भातील महत्त्वाचे श्रद्धास्थान मानले जाते. आषाढी आणि कार्तिकी एकादशीला येथे राज्याच्या विविध भागांतून भाविक दर्शनासाठी येतात. हरिनामाचा अखंड गजर, हरिपाठ, भजन, कीर्तन आणि पालखी सोहळ्यामुळे मंदिर परिसर भक्तिरसात न्हाऊन निघतो.
मंदिराच्या स्थापनेची आख्यायिका अत्यंत रंजक आहे. सन १७५० च्या सुमारास बालाजीचे निस्सीम भक्त गोविंदराव खडाखडी यांना घराबाहेर काळ्या दगडाची एक शिळा आढळली. त्या शिळेतून बालाजीची मूर्ती घडविण्यासाठी पाथरवटाने घाव घालण्यास सुरुवात केली.
मात्र प्रत्येक घावानंतर शिळेतून हरी विठ्ठल... असा प्रतिध्वनी उमटू लागला. सलग तीन दिवस हा चमत्कार घडल्यानंतर गोविंदराव खडाखडी यांना दृष्टांत झाला की, बालाजी आणि विठ्ठल एकच आहेत. त्यानंतर त्या शिळेतून विठ्ठल-रुक्मिणीची सुंदर मूर्ती घडवून तिची विधिवत स्थापना करण्यात आली. तेव्हापासून हे मंदिर वारकरी संप्रदायाच्या श्रद्धेचे प्रमुख केंद्र बनले.
आषाढी उत्सवानिमित्त शुक्रवारपासून विविध धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. सकाळी अभिषेक, सायंकाळी हरिपाठ, भजन आणि महाआरतीचे आयोजन करण्यात आले. शनिवारी रात्री ९.३० वाजेपर्यंत विठ्ठल-रुक्मिणीला पुष्पमाला अर्पण, दर्शन तसेच विठ्ठल-रुक्मिणी महिला भजन मंडळाचे भजन होणार आहे. सायंकाळी हरिपाठ आणि आरतीनंतर रात्री ७ वाजता श्री विठ्ठलाची पालखी नगरप्रदक्षिणेसाठी निघणार असून, मोठ्या संख्येने वारकरी आणि भाविक त्यात सहभागी होणार आहेत. गुरुवार ३० रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांनी उत्सवाचा समारोप होईल.
मंदिराची वैशिष्ट्यपूर्ण वास्तुरचनाही भाविकांचे लक्ष वेधून घेते. १९९१ मध्ये स्व. वसंत सूचक यांच्या अध्यक्षतेखाली संत हरिरामबाबा भगत यांच्या हस्ते तसेच डॉ. गो. वा. अंदनकर, नीळकंठराव बुरडकर, दादाभाऊ येरेवार, मोतीराम खिरटकर आणि वासुदेव कोतपल्लीवार यांच्या उपस्थितीत मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. मूळ गर्भगृह जतन करून दुमजली प्रशस्त मंदिराची उभारणी करण्यात आली. मंदिराच्या प्रवेशद्वारावर २५ फूट उंचीच्या दोन भव्य वीणा असून त्या वरच्या बाजूने चिपळ्यांनी जोडण्यात आल्या आहेत. ही वास्तुरचना मंदिराचे प्रमुख आकर्षण ठरते.
मंदिरात तीन स्वतंत्र गर्भगृह आहेत. मुख्य गर्भगृहात पितळी मखरात श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्ती विराजमान आहेत. डाव्या गर्भगृहात श्रीकृष्ण, श्रीदत्त, संत ज्ञानेश्वर आणि अर्धनारीनटेश्वर यांच्या मूर्ती आहेत, तर उजव्या गर्भगृहात गायत्री देवीची मूर्ती स्थापित करण्यात आली आहे. सभामंडपात संत नामदेवांची पाच फूट उंच भव्य मूर्ती तसेच विविध संतांच्या प्रतिमा वारकरी परंपरेच्या समृद्ध वारशाची साक्ष देतात.
आषाढी एकादशीनिमित्त मंदिर प्रशासनाने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी विशेष व्यवस्था केली आहे. गर्दीचे नियोजन, सुरक्षा, पिण्याचे पाणी आणि इतर मूलभूत सुविधांची तयारी पूर्ण करण्यात आली असून, आज दिवसभर मंदिर परिसर विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठलच्या अखंड नामघोषाने दुमदुमून जाणार आहे.
News - Chandrapur




Petrol Price




