महत्वाच्या बातम्या

 शेतकऱ्यांसाठी रब्बी हंगाम पिक स्पर्धा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अश्‍या प्रयोगशील शेतकऱ्यांना, मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्ती, मनोबल यामध्ये वाढ होऊन आणखी उमेदीने नवनवीन अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषी उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परीसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल, हा उद्देश ठेऊन राज्यांतर्गत पीकस्पर्धा योजना राबविण्यात येत आहे.

वंचित व दुर्लक्षित तसेच पौष्टिक तृणधान्य पिकांच्या क्षेत्रात आणि उत्पादन तंत्रज्ञानात वाढ होण्याची आवश्यकता विचारात घेऊन तसेच जास्तीत जास्त शेतकरी पिक स्पर्धांमध्ये सहभागी होतील, या दृष्टीकोनातून रब्बी हंगाम २०२३ पासून पिकस्पर्धा तालुका, जिल्हा व राज्य पातळीवर राबविण्यात येणार आहे. त्यानुसार कृषी विभागामार्फत रब्बी हंगाम सन २०२३ मध्ये सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवस या ५ पिकांसाठी पिकस्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.

पीकस्पर्धेतील पीके : रब्बी पीके-ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवस (एकूण ०५  पिके), पात्रता व निकष: स्पर्धेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावे जमीन असणे व ती जमीन तो स्वतः कसत असणे आवश्यक आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकासाठी स्पर्धेत भाग घेता येईल. पिकस्पर्धेमध्ये सहभागी लाभार्थींच्या स्वतःच्या शेतावर त्या पिकाखाली किमान ४० आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे.

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे : विहित नमुन्यातील अर्ज (प्रपत्र-अ), ठरवून दिलेले प्रवेश शुल्क भरल्याचे चलन, ७/१२, ८-अ चा उतारा, जात प्रमाणपत्र (केवळ आदिवासी असल्यास) पिकस्पर्धेसाठी शेतकऱ्याने सबंधित ७/१२ वरील घोषित केलेल्या क्षेत्राचा चिन्हांकित केलेला नकाशा, बँक खाते चेक/पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत. 

अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख : रब्बी हंगामामध्ये पीक स्पर्धेची अर्ज दाखल करण्याची तारीख खालील प्रमाणे राहील. ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवस - ३१ डिसेंबर, अर्ज दाखल करण्‍याच्‍या तारखेच्‍या दिवशी शासकीय सुट्टी असल्‍यास, त्‍यापुढील शासकीय सुट्टी नसलेली तारीख गृहीत धरण्‍यात यावी. तालुकास्तर, व जिल्हास्तरावरील पिकस्पर्धा निकाल - प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पिकस्पर्धा विजेते निवडण्यात येतील. स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी पीकनिहाय (प्रत्येक पिकासाठी स्वतंत्र) रक्कम ३०० रुपये राहील. व आदिवासी गटासाठी रक्कम १५० रुपये राहील.

बक्षिसाचे स्वरुप : स्पर्धा पातळी सर्वसाधारण व आदिवासी गट बक्षिस
तालुका पातळी - प्रथम 5 हजार, द्वितीय ३ हजार व तृतीय २ हजार रुपये
जिल्हा पातळी - प्रथम १० हजार, द्वितीय ७ हजार व तृतीय ५ हजार रुपये
राज्य पातळी - प्रथम ५० हजार, द्वितीय ४० हजार व तृतीय ३० हजार रुपये अशी आहेत.

रब्बी हंगाम - दुय्यम तसेच पौष्टिक तृणधान्य पिकांच्या क्षेत्रात आणि उत्पादनात वाढ होणे आवश्यक आहे, ही बाब विचारात घेऊन पिकस्पर्धेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी उपविभागीय कृषी अधिकारी किवा तालुका कृषी अधिकारी यांचेशी संपर्क साधावा.





  Print






News - Bhandara




Related Photos