१५ डिसेंबर पर्यंत महारेशीम अभियान


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : मनरेगा, पोकरा व केंद्र पुरस्कृत सिल्क समग्र योजने अंतर्गत तुती रेशीम उद्योगात महिलांचा सहभाग वाढविणे, तुतीची लागवड करुन पर्यावरणाचा संतुलन राखणे व उत्पादनात वाढ करणे तसेच रेशीम तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी 15 डिसेंबर पर्यंत महारेशीम अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानांदरम्यान शेतकऱ्यांनी तुती लागवडी करीता नावाची नोंदणी करुन घ्यावी, असे आवाहन रेशीम विकास अधिकारी यांनी केले आहे. शेतकऱ्यांना रेशीम शेतीपासुन मिळणाऱ्या उत्पादनाची परिपूर्ण माहिती नसल्याने या शेती उद्योगाकडे मोठ्या प्रमाणात शेतकरी वळलेले दिसून येत नाही. महारेशीम अभियाना दरम्यान जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी पारंपारीक शेती बरोबरच शेतीसाठी एक उत्तम पुरक व्यवसायाचा पर्याय म्हणुन रेशीम शेती बाबत जनजागृती व्हावी. सर्व सामान्य शेतकऱ्यांपर्यंत गावागावा मधून रेशीम शेतीचे महत्व पटवून देण्यात येणार आहे. इतर पिकाच्या तुलनेत मिळणारा भरघोष फायदा नफा याचे महत्व पटवून देण्यात येणार आहे. रेशीम कोषांना मिळणारे भाव लक्षात घेता व इतर पिकांचे भावामधील चढउतार पाहता शेतकऱ्यांनी रेशीम शेतीकडे वळावे, असे आवाहन रेशीम विकास अधिकारी यांनी केले. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत प्रति एकर 3 लाख 42 हजार 900 रुपये तिन वर्षासाठी तुती लागवड व किटक संगोपन गृह बांधकामाकरीता मजूरी व सामुग्री करीता लाभ देण्यात येतो. तसेच कृषि विभागाच्या पोकरा योजना व केंद्र पुरस्कृत सिल्क समग्र 2 योजनेंतर्गत रेशीम शेतीकरीता विविध योजनांसाठी लाभ देण्यात येते, असे रेशीम विकास अधिकारी ए.एस. वाघमारे यांनी कळविले आहे.
News - Wardha




Petrol Price




