महत्वाच्या बातम्या

 भारतासाठी कॅन्सर बनला गंभीर धोका : ९.३ लाख जणांचा मृत्यू 


- कॅन्सरने मृत्यू होण्यात आशियात दुसऱ्या क्रमांकावर

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / नवी दिल्ली : भारतात २०१९ मध्ये नव्याने १२ लाख कॅन्सर रुग्णांची नोंद झाली असून, ९.३ लाख रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कॅन्सरने मृत्यू होण्यात आशिया खंडात भारत दुसऱ्या क्रमांकावर असल्याचे धक्कादायक वास्तव लॅन्सेट या नियतकालिकामध्ये प्रसिद्ध झालेल्या नव्या अभ्यासातून समोर आले आहे.

कारण काय?

कॅन्सर साधारण ३४ कारणांमुळे होतो. त्यातही धूम्रपान, अल्कोहोलचे सेवन आणि वाढत असलेले प्रदूषण आणि त्यातील कणांमुळे कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे. वायू प्रदूषणामुळे कॅन्सरचे वाढते प्रमाण आशियामध्ये अतिशय चिंताजनक आहे.

शहरीकरण, ग्रामीण ते शहरी स्थलांतर आणि मोटार वाहनांचा वाढता वापर यामुळेही कॅन्सर वाढत असल्याचे संशोधकांनी सांगितले. खैनी, गुटखा, सुपारी आणि पान मसाला यामुळेही कॅन्सर वाढत असल्याचे अहवालात म्हटले आहे.

सार्वजनिक आरोग्यासाठी गंभीर धोका -

आशियातील चीन, जपान आणि भारतात कॅन्सर रुग्णांचे प्रमाण आणि मृत्यू सर्वाधिक आहेत. येथे २०१९ मध्ये तब्बल ९४ लाख नवे कॅन्सर रुग्ण सापडले असून, तब्बल ५६ लाख रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे कॅन्सर हा सार्वजनिक आरोग्यासाठी अधिक गंभीर धोका बनला आहे, असे अहवालात म्हटले आहे.

आम्ही १९९० ते २०१९ दरम्यान ४९ आशियाई देशांमधील कॅन्सरच्या २९ पॅटर्नचा अभ्यास केला. त्यानंतर आजाराचा जगावर बनत चाललेला गंभीर धोका, जखमा आणि धोके यासंदर्भात संशोधनात अभ्यास करण्यात आल्याचे संशोधकांनी सांगितले.

गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर वाढतोय- 

- आशियामध्ये श्वासनलिका आणि फुफ्फुसाचा कॅन्सर होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामुळे अंदाजे १३ लाख जणांना कॅन्सरचे निदान झाले तर १२ लाख जणांचा मृत्यू झाला.
- श्वासनलिका आणि फुफ्फुसाचा कॅन्सर होण्याचे प्रमाण पुरुषांमध्ये अधिक तर महिलांमध्ये तिसरे महत्त्वाचे कारण आहे.
- महिलांमध्ये, गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हा अनेक आशियाई देशांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर किंवा टॉप-५ कॅन्सरमध्ये आहे.

सर्वाधिक कॅन्सर?

- श्वासनलिका कॅन्सर
- स्तन कॅन्सर
- कोलन कॅन्सर
- गुदाशय कॅन्सर
- पोट आणि नॉन मेलोनोमा त्वचेचा कॅन्सर

कोणत्या देशांमध्ये कॅन्सर वाढतोय?

- भारत - नेपाळ - कतार - बांगलादेश - पाकिस्तान

मृत्यू हे ओठाचा आणि तोंडाचा कॅन्सर झाल्यामुळे भारतात होतात. तंबाखूमुळे कॅन्सरसोबतच अन्ननलिका आणि स्वादुपिंडाच्या कॅन्सरचा धोका वाढतो.





  Print






News - World




Related Photos