फिफ्टी बॉल्स क्रिकेट मध्ये महाराष्ट्राला रौप्य पदक
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / बल्लारपूर : महाराष्ट्र फिफ्टी बॉल्स असोसिएशन तर्फे प्रमाणपत्र वितरण सोहळा २ जुलै रविवारला महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय बल्लारपूर येथे पार पडला.
या प्रमाणपत्र वितरण सोहळ्याकरिता प्रमुख अतिथी काँग्रेसच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या डॉ. रजनी हजारे उपस्थित होत्या. ज्या विद्यार्थ्यांनी अखिल भारतीय फिफ्टी बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. बल्लारपूर शहरातील अनेक शाळेचे विद्यार्थी मोहाली पंजाब येथे खेळायला गेले होते. महाराष्ट्राच्या खेळाडूंनी २३ जून ते २५ जून दरम्यान फिफ्टी बॉल ऑल इंडिया क्रिकेट कॉम्पिटिशन मध्ये कॉटर फायनल पर्यंत मजल मारली. महिला क्रिकेट द्वारे महाराष्ट्र फिफ्टी बॉल्स क्रिकेट संघाने द्वितीय क्रमांक पटकाविला. सर्वांचे मान्यवरांच्या हस्ते अभिनंदन करण्यात आले.
प्रमुख अतिथी डॉ. रजनी हजारे यांनी खेळाचं महत्व खेळाडूंना पटवून दिले. खेळाडू कसा असला पाहिजे त्याबद्दल त्यांनी सांगताना म्हटले की, खेळाडूचे जीवन आईस्क्रीम सारखे असावे. चांगला माणूस घडण्यासाठी खेळणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. त्याशिवाय फ्लॅश चा अर्थ त्यांनी समजवून सांगितला जो मानवाच्या जीवनासाठी अत्यंत आवश्यक आहे. काँग्रेसच्या सक्रिय कार्यकर्ते असलेल्या डॉक्टर रजनी हजारे यांनी विद्यार्थ्यांना खेळ जीवनामध्येही योग्य प्रकारे प्रदर्शन करण्याचे आवाहन केले.
त्यानंतर काही खेळाडूंनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यामध्ये कर्णधार देवाशिष, यश जैनम आणि मयंक यांनी पुढच्या वेळेस यापेक्षा उत्कृष्ट प्रदर्शन करू, असे आश्वासन दिले. त्यानंतर शेवटी अध्यक्षीय भाषण महाराष्ट्र फिफ्टी बॉल्स क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष प्रीती निधेकर यांनी केले भविष्यात बल्लारपूर शहरात राज्यस्तरीय फिफ्टी बॉल क्रिकेट स्पर्धा आणि जिल्हास्तरीय मॉन्टेक्स बॉल क्रिकेट स्पर्धा घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.
सदर कार्यक्रमाकरिता सर्व खेळाडूंचे पालक आवर्जून उपस्थित होते. भविष्यात अशाच प्रकारे खेळांना वाढवण्यासाठी योग्य सहकार्य करण्याचे आश्वासन पालकांद्वारे देण्यात आले. प्रास्ताविक महाराष्ट्र फिफ्टी बॉल्स क्रिकेट असोसिएशनचे सचिव संजय पारधी यांनी केले.
News - Chandrapur