बल्लारपूर शहरात भीषण अग्नितांडव : वस्त्र भंडार आगीत खाक
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / बल्लारपूर : बल्लारपूर शहरात मध्यरात्री वस्ती भागात मोतीलाल प्रभुलाल वस्त्र भांडार व मालू साडी सेंटर मध्ये लागलेल्या भीषण आगीत कोट्यवधींचे नुकसान झाल्याची प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
प्राप्त माहितीनुसार शहरातील प्रसिध्द मोतीलाल प्रभुलाल वस्त्र भांडार व मालू साडी सेंटर मधे मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास अचानक भीषण आग लागल्याने खळबळ उडाली. आग लागल्याचे लक्षात येताच दुकानाचे मालक सुरेश व सुनिल मालू ह्यांना माहिती देण्यात आली. परिसरातील नागरिकांनी तत्काळ अग्निशमन विभागाला सूचना देऊन आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले.
माहिती मिळताच नगर पालिका अग्निशमन विभाग तसेच पेपर मिल व इतर ठिकाणच्या अग्निशामक दलाच्या वाहनांना पाचारण करण्यात आले. आग इतकी भीषण होती की आगीत नुकत्याच नूतनीकरण करण्यात आलेल्या सर्व वस्तू जळून खाक झाले. यात दुकानामध्ये असलेले कोट्यवधी रुपयांचे कपडे जळले आहेत.
आगी वर नियंत्रण आणण्यासाठी बल्लारपूर, राजुरा, पोंभुर्णा, चंद्रपूर, मुल, सीटीपीएस दुर्गापूर, भद्रावती, बल्लारपूर पेपरमील आणि डिफेन्सच्या वाहनांनी सुमारे 25 ट्रीप पाणी आणून 8 तासांच्या अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात आणली. बल्लारपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विशाल वाघ यांच्या मार्गदर्शनात व नेतृत्वाखाली अग्निशमन प्रभारी शब्बीर अली व टिम यांनी काम पाहिले. सुभान कुरेशी, विजय, सागर लोखंडे, सुधीर चिखराम, रितेश, सागर, हरिओम, सादिक यांनी विशेष काम केले.
घातपात की अपघात ?
मालू ह्यांच्या दुकानात लागलेली आग हा अपघात आहे, की घातपात ह्याबद्दल चर्चेला उधाण आले आहे. मागील दिवाळीच्या सुमारास दुकानाच्या तिनही मजल्यांचे नूतनीकरण करण्यात आले होते. संपुर्ण फर्निचर तयार करण्यात आले तसेच इमारतीतील वायरिंग सुद्धा बदलण्यात आली असल्यामुळे ही आग शॉर्ट सर्किट मुळे लागली असण्याची शक्यता कमी असून कुणीतरी मुद्दाम लावली असण्याबद्दल तर्कवितर्क सुरू आहेत. पोलीस तपासात आगीचे नेमके कारण स्पष्ट होईलच तुर्तास मात्र शहरात उलटसुलट चर्चा रंगल्या आहेत.
News - Chandrapur