महत्वाच्या बातम्या

 चंद्रपूर परिमंडळात वीजबिल थकबाकी पोहेाचली ४९३ कोटीच्या घरात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : महावितरणच्या उत्पन्नाच्या सुमारे ८० टक्के रक्कम वीज खरेदीवर खर्च होत असल्याने अखंड वीजपुरवठा चालू ठेवण्यासाठी वीजबिलांचे उत्पन्न हा एकमेव उपाय असून घरगुती, औद्योगिक, व्यावसायिक व कृषीग्राहक अशा सर्व ग्राहकांनी वीजबिले भरून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी केले. महावितरण सुद्धा एक ग्राहक असून इतरांकडून वीज खरेदी करून ग्राहकांना पुरवते. महावितरण स्वतः वीजनिर्मिती करत नाही किंवा कंपनीला कोणाकडून मोफत वीज मिळत नाही. महावितरणच्या एकूण उत्पन्नापैकी सुमारे ८० टक्के रक्कम ही वीजखरेदीवर खर्च होते. २०२१-२२ या गेल्या आर्थिक वर्षात महावितरणने वीजखरेदीपोटी ६९,४७८ कोटी रुपये खर्च केले.

महावितरणला ग्राहकांकडून मिळणारे वीजबिलाचे पैसे हाच उत्पन्नाचा एकमेव मार्ग आहे. बिलाच्या उत्पन्नातून कंपनी वीजखरेदीचे पैसे, कर्मचाऱ्यांचे वेतन आणि वीज प्रकल्पांचा खर्च भागवला जातो. वीजबिलांतून उत्पन्न मिळणे म्हणजे महावितरणचा श्वास चालू राहण्यासारखे आहे. अखंड वीजपुरवठा चालू ठेवण्यासाठी महावितरणकडे ग्राहकांनी वीजबिले भरणे हा एकमेव पर्याय आहे. वीज ग्राहकांची बिलांची थकबाकी ७३,३६१ कोटींवर गेल्याने ग्राहकांनी वीजबिले भरणे अधिक गरजेचे झाले आहे.

महावितरणकडून शेतकऱ्यांना खूप मोठ्या सवलतीच्या दरात वीजपुरवठा होतो. तरीही राज्यातील १५ लाख १९ हजार कृषीग्राहकांनी गेली पाच वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक काळ एकही बिल भरलेले नाही आणि त्यांच्याकडे २१,०६७ कोटी रुपये थकबाकी आहे. त्यापैकी ३ लाख २३ हजार असे कृषीपंपधारक ग्राहक आहेत ज्यांनी गेली पंधरा वर्षापेक्षा अधिक काळ एकही वीजबिल भरलेले नाही आणि त्यांच्याकडे ५,२१६ कोटी रुपयांची थकबाकी आहे.

विजेमुळे शेतीचे सिंचन होते, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढते, त्यातून त्यांना चांगले जीवन जगता येते, तरीही त्यांच्या एकूण खर्चाच्या तुलनेत कमी असलेले वीजबिल भरण्यास काही शेतकऱ्यांची अनास्था दिसते. वीज ही अत्यावश्यक सेवा आहे. पाणी पुरवठा, रुग्णालयांचे काम, इमारतीतील लिफ्ट, वाहतूक नियंत्रण, कार्यालयांचे कामकाज, बँकिंग अशा अनेक सेवा या वीजपुरवठ्यावर अवलंबून आहेत. त्यासाठी अखंड वीजपुरवठा करायचा तर महावितरणला वीज खरेदी करण्यासाठी पैसे उभे करणे आवश्यक आहे. महावितरणकडे बिलांच्या माध्यमातून पैसे आले तरच कंपनीला वीज खरेदी करणे आणि ती ग्राहकांना पुरविणे शक्य आहे. ते म्हणाले की, महावितरण ग्राहकांना केवळ वापरलेल्या विजेचे पैसे बिलाच्या स्वरुपात आकारते.

जी सेवा वापरली आहे त्याचे बिल देण्यास कोणी विरोध करेल अशी शक्यता नाही. काही ग्राहक मोबाईल बिल, डीटीएचचे बिल, केबलचे बिल अशी बिले नियमित भरत असताना त्यांच्यासाठी अत्यावश्यक सुविधा असलेल्या विजेचे बिल भरण्यास टाळाटाळ करतात हे आश्चर्यकारक आहे. चंद्रपूर परिमंडळात - चंद्रपूर व गडचिरोली जिल्हयातील घरगुती, वाणिज्यिक, औदयोगिक, सरकारी कार्यालये, सार्वजनिक पाणिपुरवठा योजना व पथदिव्यांची थकबाकी २४२ कोटी ९० लाखाच्या घरात पोहेाचली असून कृषिग्राहकांनी थकबाकी न भरल्यामुळे ८१ हजारपेक्षा जास्त कृषिपंपांची थकबाकी ही २५० कोटी ७६ लाखाच्या घरात पोहेाचली आहे.

चंद्रपूर परिमंडळात : (चंद्रपूर  व  गडचिरोली जिल्हा एक‍त्र‍ित ) चालू  वर्षातील व मागील वर्षाच्या एकंदरीत मागणीपैकी घरगुती ग्राहकांकडुन १३ कोटी ६८ लाख येणे आहे, तर वाणिज्यिक ग्राहकांकडुन ४ कोटी १२ लाख येणे आहे, औदयोगिक ग्राहकांकडुन ६ कोटी ६३ लाख थकबाकी वसुली येणे आहे, ग्रामीण व शहरी पाणीपुरवठा योजनांकडून ३ कोटी ४३ लाख तर ग्रामिण व शहरी पथदिवे यांच्याकडून २०८  कोटी ३१ लाख व कृषिपंपांच्या थकबाकीपोटी २५० कोटी ७६ लाख येणे आहेत. 

१५ वर्षांपासून १९ हजार ६६६ कृषिग्राहकांनी चंद्रपूर परिमंडळात ११२ कोटी ८० लाख भरले नाही : त्यातच, ५ ते १० वर्ष, १० ते १५ वर्ष व १५ वर्षापेक्षा जास्त काळ लेाटूनही  एकंदरीत १९ हजार ६६६ कृषिग्राहकांनी चंद्रपूर परिमंडळात म्हणजे चंद्रपूर व गडचिरोली जिल्हा मिळून, ११२ कोटी ८० लाख भरले नाही. ५ ते १० वर्षापासून १६ हजार ५३२ कृषिग्राहकांनी ८८ कोटी ७० लाख भरले नाही. तसेच १० ते १५  वर्षांपासून २ हजार ६९४ कृषिग्राहकांनी २० कोटी २८ लाख थकविले आहेत. तर १५ वर्षापांसून ४४० कृषिग्राहकांनी ३ कोटी ७२ लाख भरले नाही. असे एकंदरीत १९ हजार ६६६ कृषिग्राहकांनी चंद्रपूर परिमंडळात ११२ कोटी ८० लाख भरले नाही.

चंद्रपूर जिल्हयात : ५ ते १० वर्षापासून १२ हजार २०० कृषिग्राहकांनी ६४ कोटी २९ लाख भरले नाही. तसेच १० ते १५ वर्षांपासून २ हजार ३३५ कृषिग्राहकांनी १६ कोटी ८४ लाख थकविले आहेत. तर १५ वर्षांपासून ३४४ कृषिग्राहकांनी २ कोटी ६८ लाख भरले नाही. असे एकंदरीत १४ हजार ८९९ कृषिग्राहकांनी चंद्रपूर जिल्हयात ८३ कोटी ८० लाख भरले नाही.

गडचिरेाली जिल्हयात : ५ ते १० वर्षापासून ४ हजार ३२ कृषिग्राहकांनी २४ कोटी ४१ लाख भरले नाही. तसेच १० ते १५ वर्षांपासून ३३९ कृषिग्राहकांनी ३ कोटी ४५ लाख थकविले आहेत. तर १५ वर्षांपासून ९६ कृषिग्राहकांनी १ कोटी ५ लाख भरले नाही. असे एकंदरीत ४ हजार ७६७ कृषिग्राहकांनी गडचिरेाली जिल्हयात २८ कोटी ९० लाख भरले नाही. घरगुती, वाणिज्यिक, औदयोगिक, सरकारी कार्यालये, सार्वजनिक पाणिपुरवठा योजना व पथदिव्यांची तसेच कृषिग्राहकांनी थकबाकीचा भरणा करुन महावितरणला सहकार्य करावे असे कळकळीचे आवाहन मुख्य अभियंता सुनिल देशपांडे यांनी केले आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos