महत्वाच्या बातम्या

 सुदृढ आरोग्यासाठी राबविण्यात येत आहे राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहीम


- मनपा क्षेत्रात ४७ हजार ५६२ मुलांना देण्यात आली जंतनाशक गोळी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : महानगरपालिकेतर्फे राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त शाळांमध्ये हजर असणाऱ्या मुला-मुलींना शिक्षकांव्दारे तसेच अंगणवाडीमध्ये  शिक्षकांव्दारे एकुण ४७ ५६२ मुलांना जंतनाशक गोळ्या देण्यात आल्या. राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार १० ऑक्टोबर व मॉप अप दिन १७ ऑक्टोबर २०२२ रोजी महानगरपालिका कार्यक्षेत्रात राबविण्यात येत आहे. १० ऑक्टोबर रोजी गोळी न घेतलेल्या १  ते १९  वर्षे वयोगटातील मुला-मुलींना १७ ऑक्टोबर रोजी जंतनाशक गोळी देण्यात येणार आहे.  

जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शनानुसार मातीतून प्रसार होणाऱ्या कृमींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दोन जंतनाशक मोहिमेमधील अंतर ६ महिन्यापेक्षा जास्त नसावे म्हणून मोहिमेची प्रथम फेरी माहे २५ एप्रिल २०२२ ते २ मे २०२२ दरम्यान राबविण्यात आली व व्दितीय फेरी माहे ऑक्टोबर २०२२ मध्ये आयोजित करण्यात येत आहे.

१ ते १९  वयोगटातील बालकांमध्ये आढळणाऱ्या आतड्यांचा कृमीदोष हा मातीतून प्रसारित होणाऱ्या जंतापासून परिसर स्वच्छतेचा अभाव असल्यामुळे होतो. कृमीदोष हा रक्तक्षय आणि  कुपोषणाचे  कारण असून त्यामुळे बालकांची शारीरिक व बौद्धिक वाढ खुंटते. याकरिता राष्ट्रीय जंतनाशक दिनाचे औचित्य साधून १ ते १९ वर्ष वयोगटातील सर्व मुला – मुलींना शाळा व अंगणवाडी केंद्र स्तरावर जंतनाशक गोळी देऊन त्यांचे आरोग्यरक्षण, उत्तम पोषण स्थिती, शिक्षण व जीवनाचा दर्जा उंचावण्याचे उदि्दष्ट ठेवण्यात आले आहे.

जंताचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जंतनाशक गोळी घेण्याबरोबरच हात स्वच्छ धुणे, शौचालयाचा वापर करणे, भाज्या व फळे स्वच्छ धुवून खाणे, नखे नियामित कापणे व स्वच्छ ठेवणे, बाहेर जाताना बूट अथवा चपलांचा वापर करणे ही खबरदारी घेणेही आवश्यक आहे. ही मोहीम नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत राबविण्यात येणार आहे.

सदर गोळी खाल्यामुळे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. तथापि बालकाच्या शरीरामध्ये जंताचा प्रादुर्भाव असल्यास किरकोळ पोटदुखी, जळजळ अथवा क्वचित प्रसंगी मुलांना उलटी होऊ शकते. हे दुष्परिणाम किरकोळ स्वरूपाचे असल्याने पालकांनी घाबरून जाऊ नये.





  Print






News - Chandrapur




Related Photos