महत्वाच्या बातम्या

  ध्वजनिधी संकलनात नागपूर अव्वलस्थानी येण्यासाठी प्रयत्न करा : जिल्हाधिकारी डॅा. विपीन इटनकर


- ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : माजी सैनिकांच्या कल्याणकारी कार्यक्रमासाठी प्रत्येक वर्षी 7 डिसेंबर रोजी ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ करण्यात येतो. गेल्यावर्षी नागपूर जिल्ह्याने निधी संकलनात दुसरे स्थान पटकावले होते. यंदा नागपूर जिल्हा अव्वलस्थानी आणण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॅा. विपीन इटनकर यांनी आज येथे केले.
जिल्हा सैनिक कार्यालयाच्यावतीने ध्वजनिधी 2022 साठी संकलन शुभारंभ जिल्हाधिका-यांच्या हस्ते व सर्व मान्यवर उपस्थितांना ध्वज लावून करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, (निवृत्त) जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर डॅा.शिल्पा खरपकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी रवींद्र काटोलकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
2011 मध्ये नागपूर जिल्ह्यास सुमारे एक कोटी 92 लाख रुपयांचे उदिद्ष्ट देण्यात आले होते. प्रत्यक्ष संकलन सुमारे 3 कोटी 27 लाख रुपये करण्यात आले. एकूण उद्दिष्टांच्या ही टक्केवारी 170 टक्के इतकी होती. राज्यात निधी संकलनात नागपूर जिल्ह्याने दुसरा क्रमांक पटकावला. यंदा सर्वच विभागांनी सहकार्य करीत नागपूर जिल्हा अव्वल स्थानी यावा यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. माजी सैनिक, त्यांच्या पत्नी व पाल्यांच्या कल्याणासाठी या निधीचा उपयोग करण्यात येतो. प्रत्येकाने आपली सामाजिक जबाबदारी समजून या निधी संकलनात सहभाग नोंदवावा, असे जिल्हाधिकारी पुढे म्हणाले.
जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर डॅा. शिल्पा खरपकर (निवृत्त) यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यावेळी विशेष गौरव पुरस्कार प्राप्त माजी सैनिक व माजी सैनिकांचे पाल्य यांचा सत्कार करण्यात आला. तसेच गेल्यावर्षी ध्वजनिधी 100 टक्के संकलन केल्याबद्दल संबंधित अधिका-यांना प्रशस्तीपत्र आणि पुस्तक भेट देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी वसुधा श्रीपाद सहस्त्रभोजने यांनी एक लाख रुपयांचा धनादेश जिल्हाधिका-यांकडे सुपूर्द केला.
माजी सैनिकांच्या कल्याणकारी कार्यक्रमासाठी संपूर्ण देशभरात 7 डिसेंबर हा ध्वजदिन म्हणून पाळण्यात येतो व त्या निमित्ताने 7 डिसेंबर ते पुढील वर्षाच्या नोव्हेंबर अखेरपर्यंत निधी संकलित केला जातो. भारताच्या संरक्षणासाठी ज्यांनी आपले प्राणार्पण केले, अशा जवानांच्या कुटुंबियांच्या जीवनातील अडी-अडचणी दूर करून त्यांचे दैनंदिन जीवन सुसह्य व्हावे यासाठी त्याचप्रमाणे युध्दात अपंगत्व प्राप्त झालेल्या आणि सशस्त्र दलातून निवृत्त झालेल्या जवानांच्या पुनर्वसनाच्या विविध कल्याणकारी योजना राबविण्यासाठी या निधीचा विनियोग केला जातो.





  Print






News - Nagpur




Related Photos