जिल्ह्याचा भुजल व्यवस्थापन आराखडा : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांना सादर
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : केंद्रीय भुमि जल बोर्डाच्या वतीने वर्धा जिल्ह्याचा भुजल व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात आला आहे. हा आराखडा बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांना सादर केला. आराखड्याचे सादरीकरण देखील करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसह बोर्डाचे वैज्ञानिक कार्तिक डोंगरे, निलोफर, रोजगार हमी योजना विभागाच्या उपजिल्हाधिकारी सुप्रिया डांगे तसेच पाणी पुरवठा व जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते. केंद्र सरकारच्या जल शक्ति मंत्रालयाच्या केंद्रीय भूमि जल बोर्ड , जल संसाधन, नदी विकास व गंगा संरक्षण विभागाने जिल्ह्याचा भुजल व्यवस्थापन आराखडा तयार केला आहे. या आराखड्यामध्ये पर्जन्यमान, मान्सूनपुर्व व नंतरची पाणी पातळी, भुगर्भातील पाणी पातळीत वाढ व घट, जिल्ह्यातील भुगर्भस्थिती, माती व जमीनीचा वापर, कृषि उत्पादन क्षमता, वॅाटर टेबल, भुगर्भीय खडक, भुजल स्त्रोत, संसाधनांची उपलब्धता व वापर, पाण्याची उपलब्धता, मागणी व वापर आदींचा सखोल अभ्यास करून सदर आराखडा तयार करण्यात आला आहे. वैद्यानिक निलोफर यांनी अहवालाचे सादरीकरण केले. भुमि जल बोर्डीच्या अधिकाऱ्यांशी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्याच्या भुजल व्यवस्थापनाबाबत चर्चा केली. बोर्डाने आपल्या अहवालामध्ये सुचविलेल्या बाबींवर अंमलबजावणी करण्यात येईल, असे यावेळी सादरीकरणानंतर जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सांगितले.
News - Wardha