महत्वाच्या बातम्या

 राज्यातील चार लाख शेतकरी अजूनही केवायसी विना


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : राज्यातील चार लाख शेतकऱ्यांची ई-केवायसी करण्यासाठी १५ जानेवारी २०२४ ही डेडलाइन दिली होती. मात्र, आतापर्यंत सुमारे चार लाख शेतकऱ्यांची ई-केवायसी झाली आहे.

त्यामुळे पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी (पीएम किसान) योजनेचा लाभ घेण्यास अडचणी निर्माण झाल्या. ई-केवायसीसाठी राज्य शासनाकडून मुदतवाढ देणार की नाही, याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

पीएम-किसानचा चौदावा हप्ता वाटला जात असताना तीन अटींचे पालन करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या महाराष्ट्रात अवघी ७० लाख होती. परंतु, कृषी विभागाने सातत्याने प्रयत्न करत पंधराव्या हप्त्याच्या वाटपावेळी ही संख्या ८४ लाखांवर नेली. कृषी संचालक दिलीप झेंडे यांच्याकडून योजनेचा विस्तार करण्यासाठी सातत्याने आढावा घेतला जात आहे. राज्यात सध्या सुरू असलेल्या ई-केवायसी मोहिमेमुळे आतापर्यंत ८६.४८ लाख शेतकऱ्यांना योजनेच्या कक्षेत आणण्यात आले. ई-केवायसीसाठी ६ डिसेंबर २०२३ पासून राज्यभरात विशेष मोहीम सुरू आहे. १५ जानेवारी २०२४ ही या मोहिमेची डेडलाइन आहे. कृषी आयुक्त डाॅ. प्रवीण गेडाम यांनी काही दिवसांपूर्वीच या योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा घेऊन लक्ष्य पूर्ण करण्याच्या सूचना राज्याच्या कृषी यंत्रणेला दिल्या होत्या.

अशी करा शेतशिवारातून ई-केवायसी -

पहिल्यांदा पीएम किसान पीएमकिसानडॉटजीओव्हीडॉटइनच्या अधिकृत वेबसाइटवर जावे. त्यानंतर मुख्य पृष्ठावरील ई-केवायसी पर्यायावर क्लिक करा. त्यात आधारकार्ड नंबर आणि कॅप्चा कोड टाकावा. त्यानंतर सर्च पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर आधारशी लिंक केलेला मोबाइल नंबर टाका. मोबाइल नंबरवर आलेला ओटीपी प्रविष्ट करा. सबमिट पर्यायावर क्लिक करा. अशा पद्धतीने केवायसी प्रक्रिया पूर्ण होईल. पात्र व्यक्तींनी गावातील संबंधित व्हिलेज नोडल ऑफिसर, कृषी सहायक, तलाठी, ग्रामसेवकांशी संपर्क साधून विशेष मोहिमेत सहभागी व्हावे व प्रलंबित बाबींची पूर्तता करून घ्यावी. जेणेकरून कोणताही शेतकरी वंचित राहणार नाही, असे आवाहन चंद्रपूर कृषी विभागाने केले आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos