महत्वाच्या बातम्या

 लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन इलेक्शन मोडवर 


-  राष्ट्रीय कार्य म्हणून प्रत्येक कर्मचाऱ्याने दायित्व द्यावे
-  मनुष्यबळ लपविणाऱ्या विभाग प्रमुखावर कारवाई
-  नेमणुका बदलविण्यासाठी दबाव आणणाऱ्यांवर कारवाई
-  यादीमध्ये मृतकाचे नाव आल्यास ग्रामसेवक जबाबदार

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : आगामी निवडणुकांमध्ये जिल्ह्यातील मतदारांची संख्या वाढणे, निवडणुकांमध्ये अधिकाधिक पारदर्शिता, आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी, गतिशील कामे यासोबतच राष्ट्रीय कार्य म्हणून प्रत्येक कर्मचाऱ्यांनी आपले दायित्व पूर्ण करावे, जिल्ह्यात आज पासून निवडणुकीच्या कामाची सुरुवात झाली आहे असे समजून सतर्क असावे, अशी सूचना जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी आज आयोजित बैठकीत केली.

भारत निवडणूक आयोगाकडून निवडणूक कार्यक्रम पुढील वर्षात घोषित होईल. तत्पूर्वी, जिल्हा प्रशासनाने आजपासूनच इलेक्शन मोडमध्ये येऊन कामाला सुरुवात करावी, असे स्पष्ट निर्देश त्यांनी आज येथे दिले. बचत भवन येथे झालेल्या या बैठकीला जिल्हाधिकाऱ्यांसोबत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, जिल्हा निवडणूक उपजिल्हाधिकारी प्रवीण महिरे आदी उपस्थित होते.

आगामी निवडणुका संदर्भात वेगवेगळ्या समित्या गठीत करण्यात आलेल्या आहे. या समित्यांचे सर्व विभाग प्रमुख यावेळी उपस्थित होते. विभागवार आढावा घेण्यात आला. निवडणुकीसाठी मनुष्यबळ उपलब्ध न करणाऱ्या विभागांवर तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश दिले. प्रामुख्याने शिक्षण, पंचायत समिती व जिल्हा स्तरावरील काही विभागांनी अद्याप आपले मनुष्यबळ कळवले नाही. सर्व विभाग प्रमुखांनी 4 जानेवारी पर्यंत मनुष्यबळ कळविण्याचे स्पष्ट करण्यात आले.

निवडणुकीच्या वेळेस नेमणुकांमध्ये बदल करणे, जागा बदलून मागणे, दिलेल्या जागेवर काम करण्यास असमर्थता दर्शविणे, आरोग्याचे वेगवेगळे कारण सांगणे, अशा प्रकारचे अनेक अर्ज कर्मचाऱ्यांकडून येत असतात. मात्र यामध्ये कोणताही बदल करण्यात येणार नाही. निवडणुकीचे कार्य हे राष्ट्रीय कार्य असून त्याकडे तेवढ्याच सकारात्मकरित्या कर्मचाऱ्यांनी बघावे, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

मतदार जागृतीच्या संदर्भातील उपक्रमाचे प्रमुख यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांना घोषित करण्यात आले. त्यांना सर्व विभागाने मदत करावी यावर्षी नागपूर जिल्ह्यामध्ये सर्व निवडणुकांमध्ये विक्रमी मतदान व्हावे व युवकांचे मतदान सर्वात अधिक असावे याकडेही त्यांनी यावेळी लक्ष वेधले. यासाठी वेगवेगळ्या उपक्रमांना जिल्ह्यात सुरुवात झाली आहे .यामध्ये गती आणण्याचे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी नागपूर महानगरातील तरुणाईला त्यांनी आवाहन केले.निवडणुकांमध्ये मतदान करणे हे राष्ट्रीय कर्तव्य आहे . यासाठी युवकांनी पुढे यावे व आपल्या आजूबाजूच्या सोसायटीमधील ज्या लोकांनी मतदार म्हणून नोंदणी केली नसेल नावे मतदार यादी मध्ये आली नसेल किंवा मृत झालेल्या नागरिकांची नावे कमी करायची असेल यासाठी निवडणूक विभागाला सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. नागपूर सारख्या सुशिक्षितांच्या महानगरामध्ये मतदानाची टक्केवारी कमी असणे योग्य नाही. ग्रामीण भागापेक्षा शहरी भागांमध्ये सुशिक्षितांची संख्या अधिक असताना देखील मतदानाची टक्केवारी कमी असते. यासाठी प्रत्येक शिक्षित नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहनही त्यांनी केले.

मृत नागरिकांची नावे मतदार यादीत राहणार नाही यासाठी ग्रामीण भागात ग्रामसेवकांना जबाबदार धरण्यात येईल. त्यांनी चुकीने देखील अशी नावे राहणार नाही यासाठी मृत मतदारांचा शोध घेऊन नावे काढून टाकण्यासाठी निवडणूक विभागाला मदत करावी, असे आवाहन केले. यावेळी सर्व उपविभागीय अधिकारी उपस्थित होते त्यांनी पुढील काही दिवसांमध्ये मतदार यादी अद्यावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये संपूर्ण यंत्रणा कार्यरत करावी असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.





  Print






News - Nagpur




Related Photos