अहेरी येथे राजे अम्ब्रीशराव आत्राम यांच्या उपस्थितीत सव्वा लाख किसान समृद्धी केंद्रांचे लोकार्पण कार्यक्रमाचे ऑनलाइन प्रक्षेपण संपन्न
- अहेरी परिसरातील शेतकऱ्यांची तुफान गर्दी, राजेंचा हस्ते ताडपत्रीचे वितरण
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / अहेरी : देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी २७ जुलै ला देशभरातील १ लाख २५ हजार प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्रांचे लोकार्पण केले. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी ऑनलाइन सुसंवाद साधला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी राजस्थानातील सीकर येथे आयोजित कार्यक्रमात उपस्थित राहून विविध कार्यक्रमांचे उदघाटन केले. यावेळी शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारी बी-बियाणे, औषधे, औजारे, खते हे एकाच ठिकाणी मिळावे या उद्देशाने प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्र ह्या योजनेचा प्रारंभ आणि पीएम किसान सन्मान निधी १४ वा हप्ता वितरित करण्यात आले. या कार्यक्रमाचे भारतीय जनता पार्टी अहेरीच्या वतीने स्थानिक विठ्ठल रुक्मिणी मंदिरात लाईव्ह प्रेक्षपण करण्यात आले. या कार्यक्रमात माजी पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम हे पूर्णवेळ उपस्थित राहून शेतकऱ्यांशी आस्थेने संवाद साधला, यावेळी शेतकऱ्यांनी तुफान गर्दी केली होती.
या कार्यक्रमाला तालुका कृषी अधिकारी संदेश खरात तसेच कृषी केंद्र संघटनाचे अध्यक्ष राकेश गुप्ता प्रामुख्याने उपस्थित होते. राजस्थानातून तसेच देशभरातून प्रत्यक्ष आणि आभासी उपस्थितीच्या माध्यमातून सुमारे २ कोटी शेतकरी यावेळी उपस्थित राहून या कार्यक्रमाला खऱ्या अर्थाने अत्यंत महत्त्वाच्या संमेलनाचे स्वरूप देण्यात आले. देशभरातील ७३२ कृषी विज्ञान केंद्रे (केव्हीकेएस), ७५ आयसीएआर संस्था, ७५ राज्य कृषी विद्यापीठे, ६०० पंतप्रधान किसान समृद्धी केंद्रे, ५ हजार प्राथमिक कृषी सहकारी संस्था आणि ४ लाख सामान्य सेवा केंद्रांचे प्रतिनिधी या कार्यक्रमाला उपस्थित होते.
या कार्यक्रमाला भाजपा तालुका अध्यक्ष रवी नेलकुद्री सहित भाजपा पदाधिकारी तसेच अहेरी तालुक्यातील शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रधानमंत्री किसान योजनेच्या १४ व्या हप्त्याचे वाटप :
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) ही जगातील सर्वात मोठ्या थेट लाभ हस्तांतरण योजनांपैकी एक आहे. सरकारची ही प्रमुख योजना, सर्वसमावेशक आणि उत्पादक कृषी क्षेत्रासाठी धोरणात्मक कृती सुरू करण्याच्या केंद्र सरकारची वचनबद्धता व्यक्त करणारी आहे.
राजे अम्ब्रिशराव आत्राम, माजी पालकमंत्री गडचिरोली जिल्हा
गंधक लेपित युरियाचा प्रारंभ (युरिया गोल्ड) :
सल्फर म्हणजे गंधक लेपित युरिया जे युरिया गोल्ड म्हणून ओळखले जाते, ते जमिनीतील सल्फरची कमतरता दूर करेल. हे नाविन्यपूर्ण खत कडुलिंबाचे आवरण असलेल्या युरियापेक्षा अधिक किफायतशीर आणि कार्यक्षम आहे. यामुळे नायट्रोजनचा वापर कमी होईल आणि यामुळे पिकाची गुणवत्ता वाढेल.
(संदेश खरात, तालुका कृषी अधिकारी)
News - Gadchiroli