कोलकाता पावसाने जलमय : वाहतूक ठप्प, ५ जणांचा मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / कोलकाता : महाराष्ट्रातील मराठवाड्यासह देशातील विविध भागांत पावसाचा तडाखा सुरू असतानाच पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथेही सोमवारी रात्रीपासून मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत केले आहे. सहा तासांत तब्बल ३५० मिमी पावसाची नोंद झाली असून, शहरातील अनेक भागात गुडघाभर पाणी साचले आहे.
पावसामुळे अनेक निवासी वस्त्यांत पाणी शिरले असून, रस्त्यांवर वाहतूक ठप्प झाली आहे. विजेचा प्रवाह पाण्यात उतरल्याने झालेल्या दुर्घटनांमध्ये आतापर्यंत ५ जणांचा मृत्यू झाला आहे.
महानायक उत्तम कुमार आणि रवींद्र सरोवर स्थानकांदरम्यान पाणी साचल्याने मेट्रो सेवा बंद करण्यात आली आहे. शहीद खुदीराम बोस ते मैदान स्थानकांदरम्यान मेट्रो पूर्णपणे थांबवण्यात आली असून, दक्षिणेश्वर ते मैदान दरम्यान मर्यादित सेवा सुरु आहे. पंपाचा वापर करून पाणी बाहेर काढण्याचे काम सुरू असून, कर्मचारी आणि अधिकारी वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
हवामान विभागाने कळवले की, उत्तर-पूर्व बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हा मुसळधार पाऊस झाला आहे. तसेच २५ सप्टेंबरच्या दरम्यान पुन्हा एक कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता असल्याने येत्या दिवसांत आणखी पाऊस पडेल, असा इशारा देण्यात आला आहे.
News - World




Petrol Price




