महत्वाच्या बातम्या

 राष्ट्रीय शेतकरी दिवस साजरा


- शेतकऱ्यांनी उत्पन्न वाढीसाठी नविनतम तंत्रज्ञानाचा अवलंब करावा : डॉ.सी.डी. मायी माजी अध्यक्ष कृषि वैज्ञानिक निवड मंडळ (ASRB) नवी दिल्ली

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : भारतीय कृषि अनुसंधान परिषद अंतर्गत सिरकॉट जिनिंग प्रशिक्षण केंद्र नागपूर व कॉन्फेडरेशन ऑफ इंडीयन टेक्स्टाइल इंडस्ट्रीज कॉटन डेव्हलपमेंट अँड रिसर्च असोसिएशन (CITI-CDRA), मुंबई ह्यांच्या संयुक्त विद्यमाने २३ डिसेंबर २०२३ रोजी जिनिंग प्रशिक्षण केंद्र नागपूर येथे राष्ट्रीय शेतकरी दिवस साजरा करण्यात आला. 

सादर कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून डॉ.सी.डी. मायी माजी अध्यक्ष कृषि वैज्ञानिक निवड मंडळ (ASRB) नवी दिल्ली व डॉ.ए.एल.वाघमारे संचालक, कापूस विकास संचालनालय, नागपूर हे उपस्थित होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून रवींद्र मनोहरे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नागपूर, डॉ. विद्या मानकर, प्राचार्य, रामेती, नागपूर आणि डॉ. मणिकंदन, वरिष्ठ शास्त्रज्ञ, आयसीएआर- सीआयसीआर, नागपूर, डॉ.के. पांडियन, वरिष्ठ शास्त्रज्ञ, GTC ICAR- CIRCOT, नागपूर, गोविंद वैराळे, समन्वयक, सिटीसीडीआरए मुंबई हे यावेळी उपस्थित होते. 

डॉ. पांडियन यांनी स्वागतपर भाषण केले आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्पर्धा करण्यासाठी कापसाचा दर्जा टिकवून ठेवण्याचे महत्त्व त्यांनी सांगितले. गोविंद वैराळे यांनी प्रास्ताविकात महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या अतिघन कापूस लागवड पद्धत या प्रकल्पाविषयी माहिती दिली. 

रवींद्र मनोहरे यांनी शेतकऱ्यांना कापसाचे मूल्यवर्धन करण्यासाठी एफपीओ तयार करण्याचा सल्ला दिला आणि प्रिमियम दर्जाच्या कापूस गाठींचे उत्पादन करण्यासाठी जागतिक बँकेने निधी दिलेल्या स्मार्ट प्रकल्पा विषयी माहिती दिली. 

डॉ. विद्या मानकर यांनी कापसाच्या शेतात गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावावर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना बाबत मार्गदर्शन केले. आणि कापसाचा दर्जा आणि उत्पादन वाढण्यासाठी आधुनिक शेती पद्धती बद्दल माहिती दिली. 

डॉ. मणिकंदन यांनी कापूस फुलांचची गळती रोखण्यासाठी योग्य वेळी वनस्पतींच्या वाढ नियामकांच्या वापराविषयी सांगितले जेणेकरुन उत्पादकता वाढेल. तसेच कापसाच्या बोंडाची संख्या वाढवण्यासाठी कापूस झाडाचे शेंडे खोडणे व कापुस झाडाची गळ फांदी काढल्यामुळे कापूस उत्पादना मध्ये कशा प्रकारे वाढ होते याबाबतचे विस्तृतपणे मार्गदर्शन केले. त्यानंतर विदर्भातील प्रगतीशील शेतकऱ्यांचा त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल सत्कार करण्यात आला. याप्रसंगी कचरामुक्त कापूस वेचणी करीता उपस्थित शेतकऱ्यांना कापडी गोण्याचे वितरण करण्यात आले.

डॉ.ए.एल. वाघमारे संचालक, कापूस विकास संचालनालय, नागपूर यांनी कृषि मंत्रालया अंतर्गत कापूस उत्पादन वाढीसाठी विविध उपक्रम तसेच २०२३-२४ मध्ये राबविण्यात येत असलेले कापसाच्या विशेष पथदर्शी प्रकल्पाबाबत विस्तृत माहिती दिली. 

कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.सी.डी. मायी माजी अध्यक्ष कृषि वैज्ञानिक निवड मंडळ (ASRB) नवी दिल्ली यांनी कापूस उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे उत्पादनात कशी कशी वाढ होऊ शकते. याबाबत विस्तृत माहिती दिली. 

एक गाव ज्यामध्ये एक किंवा दोन कापूसवाणांची लागवड करुन एकात्मिक कीड नियंत्रण पीबी नॉट बंधन प्रकल्प सारखा पद्धतीचा वापर करण्याबाबत आवाहन केले व कापसाचे किमान आधारभूत दर ठरवितांना महाराष्ट्र मध्ये जास्तीत जास्त कोरडवाहू क्षेत्र असल्यामुळे कोरडवाहू कापूसाचे दर हे ओलिताच्या कापूस दरा पेक्षा अधिक असावे असे मत व्यक्त केले. 

विदर्भातील नागपूर, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर या जिल्ह्यातील प्रगतीशील शेतकऱ्यांचा त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल मानचिन्ह देऊन प्रमुख अतिथींच्या हस्ते स्वप्नील शेळके वर्धा, रमेश गोबाडे वर्धा, उज्वल जैन वर्धा, यशोधनंदन काबरा वर्धा, मदन भोंडे नागपूर, वामनजी ढोरे नागपूर, नंदू बघुले नागपूर, सुरेश पोतराजे चंद्रपूर, भानुदास बोधाने चंद्रपूर, अभय भोयर यवतमाळ यांचा सत्कार करण्यात आला. 

कार्यक्रमाचे संचालन व आभार डॉ. वर्षा साटणकर, शास्त्रज्ञ, सिरकॉट जीटीसी, नागपूर यांनी केले. या कार्यक्रमामध्ये प्रकल्प अधिकारी जगदीश नेरलवार, अमीत कावडे, युगांतर मेश्राम, रिद्धेश्वर आकरे, सिटीसीडीआरए स्टाफ आणि विदर्भातील सुमारे १२५ शेतकऱ्यांनी सहभाग घेतला.





  Print






News - Nagpur




Related Photos