अमरावती जिल्ह्यातील रस्ते बांधकामा संदर्भात उच्चस्तरीय चौकशी करणार : सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / मुंबई : अमरावती जिल्ह्यातील धानोरा गुरव, नांदसावंगी पापळ वाढोणा रस्त्याच्या कामासंदर्भात तक्रारी येत असल्याने याबाबत उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितले. विधानसभा सदस्य प्रताप अडसड यांनी याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती. यावेळी सदस्य अँड. आकाश फुंडकर यांनीही प्रश्न उपस्थित केले.
मंत्री चव्हाण म्हणाले की, या रस्त्याच्या बांधकामासाठी 19 कोटी 55 लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून 19 कोटी 47 लाख 50 हजार रुपयांची तांत्रिक मान्यता देण्यात आली आहे. या रस्त्याच्या कामासाठी 10 ऑगस्ट 2022 रोजी कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत. या कामाच्या निविदेत बॅच मिक्स प्लांट कामाच्या ठिकाणापासून 60 किमीपर्यंत असावा, अशी अट आहे. कंत्राटदाराचा बॅच मिक्स प्लांट 60 किमी च्या आत नसल्यास तो स्थलांतरित करण्यासाठी 25 लाख रुपयांचा एफडीआर जोडावा अशी अट आहे.
कंत्राटदाराचा बॅच मिक्स प्लांट निविदा भरतेवेळी पांढरकवडा येथे होता, त्यामुळे कंत्राटदाराने 25 लाख रुपयांचा एफडीआर जोडला होता. हा प्लांट पांढरकवडा येथून दारव्हा येथे 60 किमी मध्ये स्थलांतरित केला आहे. हे काम मानका प्रमाणे झालेले असले, तरी विधानसभा सदस्यांच्या तक्रारी येत असल्याने याबाबत चौकशी करण्यात येईल.
News - Rajy