महत्वाच्या बातम्या

 महिलांना व्यवसायात संधी शोधता आल्या पाहिजे : माजी जि.प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम


- कालीनगर येथे महिला सशक्तीकरण अभियान

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / मुलचेरा : समाजात वावरतांना आणि इतर विविध व्यवसाय करतांना महिलांना अनेक समस्या जाणवतात मात्र, त्यावर मात करून महिलांना खंबीरपणे व्यवसायात संधी शोधता आल्या पाहिजे, असे मत माजी जि.प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांनी व्यक्त केले.

मुलचेरा तालुक्यातील कालीनगर येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात महिला सशक्तीकरण अभियानाच्या उदघाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी अभियानाचे अध्यक्ष म्हणून तहसीलदार चेतन पाटील, विशेष अतिथी म्हणून जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी बस्वराज मस्तोडी, जिल्हा पशू संवर्धन अधिकारी कुमरे, प्रमुख पाहुणे म्हणून गटविकास अधिकारी एल.बी. जुवारे, तालुका कृषी अधिकारी विकास पाटील, कालीनगर चे सरपंच आकुल मंडल, सुंदरनगर चे सरपंच जया मंडल, गटशिक्षणाधिकारी नेताजी मेश्राम, ग्रा.प. सदस्य मीना हलदार, वनिता बसू, पोलिस पाटील तसेच आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना अफाट लोकसंख्या असलेल्या भारतासारख्या देशात रोजगाराच्या संधी निर्माण करण्याच्या दृष्टीने महिला उद्योजकांच्या भूमिकेचा गांभीर्याने विचार करायला हवा. महिलांकडून विकसित केले जाणारे व्यवसाय देशाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. त्याचप्रमाणे महिला स्वतःचा विकास करून इतर महिलांना सशक्त आणि स्वावलंबी बनवण्यास हातभार लावू शकतात. महिलांना सर्व प्रकारचे काम सहज आणि सुलभ पद्धतीने करता आले पाहिजे यासाठीच केंद्र आणि राज्य सरकारने महिला सशक्तीकरण सारखे अभियान हाती घेतले आहे. शासन आणि प्रशासनाने पुढाकार घेतला असून आता महिलांनी देखील एक पाऊल पुढे यावे, असे आवाहन देखील त्यांनी केले.

मुलचेरा तालुक्यातील कालीनगर येथे घेण्यात आलेले हे दुसरे महिला सशक्तीकरण अभियान असून कालीनगर आणि अडपल्ली ग्रामपंचायत अंतर्गत लक्ष्मीपूर, विजयनगर, गांधीनगर, अडपल्ली माल आणि चेक अंतर्गत समाविष्ट गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी महसूल विभाग, तालुका कृषी अधिकारी विभाग, पंचायत विभाग, वन विभाग, महिला व बाल कल्याण विभाग, शिक्षण विभाग, भूमी अभिलेख विभाग, आदिवासी विकास विभाग, आरोग्य विभाग, उमेद बचत गट, बँक विभाग तसेच संजय गांधी योजना, सेतू व निवडणूक विभागाने स्टॉल लावून विविध योजनांची जनजागृती केली तसेच गरजूंना लाभ दिले.

उपस्थित मान्यवरांनी देखील महिलांना मोलाचे मार्गदर्शन करून विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळ अधिकारी वाय.पी. भांडेकर यांनी केले तर सूत्रसंचालन तलाठी रितेश चींदम यांनी केले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos