धार्मिक तेढ निर्माण करण्यासाठी दंगली घडविण्याचे षडयंत्र
- खासदार बाळू धानोरकर यांचा आरोप, श्री संताजी विचार मंचाचा कार्यक्रम
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / बल्लारपूर : जेव्हा जेव्हा देशात कट्टरतावादी सरकार सत्तेत येते. तेव्हा देशातील बहुसंख्येने असलेला हिंदू बांधव धोक्यात सापडतो. देशात धार्मिक तेढ, जातीय दुरावा निर्माण करून दंगली घडविण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. देशात २०१२-१३ पर्यंत देशातील हिंदू धोक्यात नव्हते. मात्र, २०१४ पासून देशातीला हिंदूबांधव धोक्यात आहे. देशात शांतता सुव्यवस्था राखण्यासाठी आणि देशाची जात धर्मापलीकडे जाऊन प्रगती करण्यासाठी कट्टरतावाद्यांना सत्तेच्या बाहेरचा रस्ता दाखविण्यासाठी बहुजन समाजाने ताकदीने एकत्र येणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन खासदार बाळू धानोरकर यांनी केले.
श्री संताजी विचार मंचातर्फे शनिवारी मनपाच्या प्रांगणावर बहुजनांचा संघर्ष आणि दिशा आणि एकपात्री नाट्यप्रयोग भाकर पार पडले. त्याप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. याप्रसंगी प्रसिद्ध वक्त्या अँड. वैशालीताई डोळस यांची उपस्थिती होती. याप्रसंगी मुख्य आयॊजक सूर्यकांत खनके, धनोजे कुनबी समाज मंदीर अध्यक्ष अँड. पुरूषोत्तम सातपुते, सेल्फ रिस्पेक्ट मुव्हमेंट अध्यक्ष बळीराज धोटे, डॉ. संजय घाटे, चंद्रपूर ग्रामीण काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, चंद्रपूर जिल्हा शहर जिल्हाध्यक्ष रितेश तिवारी, माजी नगरसेवक प्रशांत दानव, जनविकास सेना अध्यक्ष पप्पू देशमुख, बाळू खोब्रागडे, हिराचंद्र बोरकुटे, प्रा.डॉ. ईसादास भडके, प्रा.शिंदे, पी. आर. बोरकर, संगीता अमृतकर, चंदाताई वैरागडे, जावेद शेख, प्रा. बोबडे.
अनुताई दहेगावकर, माजी नगरसेवक नंदू नागरकर, शालिनीताई भगत, दौलत चालखुरे, डोंगरे, अजय वैरागडे, शैलेश जुमडे, जितेंद्र इटनकर, राजेंद्र राघाताटे, आकाश साखरकर, नीलेश बेलखेडे, देविदास दानव, गोविल मेहरकुरे, गोपाल अमृतकर, योगेश दुधपचारे, योगेश देवतळे, नरेंद्र जोरगेवार, आनंद अंगलवार यांची उपस्थिती होती. प्रारंभी मंचावरील सर्व मान्यवरांचा ग्रंथ देऊन सन्मान करण्यात आला. अँड. वैशालीताई डोळस आणि महेंद्र गोंडाने यांना खासदार बाळू धानोरकर यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. दीप प्रज्वलन झाल्यानंतर महेंद्र गोंडाने नागपूर लिखित एक पात्री नाट्य भाकर सादर करण्यात आले.
मनुस्मृती व्यवस्था लागू करण्याची प्रक्रिया- अँड. वैशाली डोळस बलुतेदारी सुरू करून मनुस्मृती व्यवस्था लागु करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. संविधाना प्रती उदासीनता दाखवून प्रश्न सुटणारे नाहीत हे बहुजन समाजाने आणि विशेषतः बहुजन युवकांनी लक्षात घ्यावे. भारतीय बहुजन समाजाच्या डोक्यात कट्टर धार्मिकतेचा किडा भरून संमोहित केले जात असल्यामुळे देशाची आर्थिक परिस्थिती हलाखीची झाली आहे, असेही त्या म्हणाल्या. विविध साम्राज्याचा आक्रमणातून, करोडो बलिदानातून,हजारो आंदोलनातून, शिस्तबद्ध विरोधातून, धर्म निरपेक्षतेच्या गाजावाजाने, लोकशाहीच्या मिरवणुकीने संविधानाच्या मार्गावर दिमाखदार तोऱ्यात उभा झालेला देश जर कोणी विकण्याचा प्रयत्न करून देशात बहुजनांना गुलाम बनविण्याचे षडयंत्र राबवित असेल तर त्याची पळती वाट लावण्यासाठी बहुजन समाजाने एक होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन अँड. वैशालीताई डोळस यांनी केले.
चंद्रपूर जिल्हयातून सागवान जर अयोध्येत जात असेल तर राम मंदिराच्या विश्वस्त मंडळामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील बहुजन समाजातील व्यक्ती का नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. चंद्रपूर जिल्ह्यातील सागवान जर राम मंदिराला चालत असेल तर बहुजन समाजातील व्यक्ती या व्यवस्थेला का चालत नाही हे विचारण्यासाठी एक व्हा. बहुजन एकतेची ताकद दाखवा आणि विषमतावादी आणि संविधान विरोधी व्यवस्थेला हद्दपार करण्याची मोठी जबाबदारी बहूजन समाजावर येऊन ठेपली आहे. प्रास्ताविकात सूर्यकांत खनके यांनी केले. ते म्हणाले की, भांडवलशाही सरकारच्या हातात देशात बेबंदशाही आणि जुलूमशाही सत्ता सुरु झालेली असून देश हुकूमशाहीकडे वाटचाल करतो आहे. संविधानाचे समता बंधुता आणि न्यायाचे तत्व पायदळी तुडवली जात आहेत.
लोकशाहीच्या मार्गाने छुप्पीगिरी करून भांडवलशाही वाढविण्याचे नाहक हेतुपुरस्सर प्रयत्न केले जात असल्यामुळे बहुजन समाजाने भविष्यातील धोक्याची घंटा लक्षात घेऊन एकत्र येऊन हुकूमशाही विरुद्ध संविधानिक लोकशाहीच्या लढ्याच्या संघर्षात एकतेची वर्जमुठ बांधण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांची भाषणे झाली. आभार गोपाल अमृतकर यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
News - Chandrapur